सोमवारी सुरक्षा दलांचे पथक येथील जंगलात शोध मोहीम राबवत होते, जिथे तीन टीआरएफ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. हा परिसर श्रीनगरच्या बाहेरील भागात आहे. या जंगलात दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि सर्वजण ठार झाले. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या ठार झालेल्या दहशतवाद्यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असू शकतो असे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कराने ही कारवाई केली. तथापि, या चकमकीबाबत लष्कराने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाला काही संशयित लोकांची हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने परिसरात शोध मोहीम हाती घेतली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर आता मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.ड्रोनच्या माध्यमातून ठार झालेल्या दहशतवाद्यांचे फोटो काढण्यात येणार असून तातडीने एनआयएला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक हिंदू पर्यटक होते. या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली होती, जी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी मानली जाते. मात्र, नंतर त्यांनी या हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचे नाकारले.