नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मोठा गोंधळ झाला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित वकिलाचं नाव राकेश किशोर असल्याचं ओळख पटली आहे.
advertisement
आज सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या दरम्यान ही धक्कादायक संतापजनक घटना घडली आहे. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ताब्यात घेतले. यावेळी त्याने घोषणाबाजी केली. 'सनातन का अपमान नहीं सहेंगे' अशा घोषणा आरोपी वकिलाने दिल्या. या घटनेनंतर न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या वृत्तांनुसार, आरोपी वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. तर, काहींच्या मते त्याने कागदाचे बोळे फेकण्याचा प्रयत्न केला. कोर्ट रुममध्ये एवढा गोंधळ झाल्यानंतरही सरन्यायाधीशांनी आपले कामकाज सुरू ठेवले. या घटनेमुळे आम्ही विचलित झालो नाही, तुम्ही देखील विचलित होऊ नका. आम्हाला अशा प्रकारामुळे काही फरक पडत नसल्याचे म्हणत सरन्यायाधीशांनी आपले कामकाज सुरू ठेवले.
दरम्यान, ही घटना काही वेळेसाठी झाली असली तरी देशातील सर्वोच्च न्यायलयात झालेल्या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
'त्या' याचिकेवरील सुनावणीतील टिप्पणीमुळे बूट फेक?
सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने 16 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील खजुराहो येथील एका मंदिरात भगवान विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
यावेळी याचिका फेटाळून लावताना त्यांनी जर तो भगवान विष्णूचा मोठा भक्त असेल, तर त्यानं प्रार्थना करावी आणि थोडं ध्यान करावं, असे म्हटले. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले होते. सोश मीडियावर आपली टिप्पणी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे त्यांनी वादानंतर म्हटले होते. आपण सगळ्याच धर्मांचा आदर करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सोशल मीडियावर गोष्टींना चुकीच्या पद्धतीनं दाखवणं चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.
सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरन्यायाधीशांनी हिंदूंच्या श्रद्धेची थट्टा केली असल्याचा आरोप करण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिराच्या परिसरात असलेल्या जवारी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती पुन्हा स्थापित करण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. हे काम पुरात्व विभागाच्या अखत्यारीत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले होते.