राखेचे ढग थेट शहरांवर!
सोमवारी संध्याकाळी हे राखेचे ढग राजस्थानमधून थेट भारतात आले. हे ढग हवेत १० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असल्याने त्याचा हवेची गुणवत्ता काही अंशी खराब झाली. तर विमान उड्डाणांना मोठा फटका बसला आहे. ज्वालामुखीच्या या राखेत सल्फर डायऑक्साइड, लहान काचेचे कण आणि खडक असल्याने यामुळे आकाश अंधुक दिसू शकतं. IMD चे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितले की, शहरांवर याचा परिणाम केवळ काही तासांसाठीच अपेक्षित आहे.
advertisement
DGCA कडून ऑरेंज अलर्ट आणि विमान रद्द
या धोकादायक राखेच्या ढगांमुळे हवाई वाहतुकीवर लगेच परिणाम दिसून आला. अकासा एअर आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांना त्यांची अनेक विमाने रद्द करावी लागली किंवा वळवावी लागली. डीजीसीएने तातडीने विमान कंपन्यांसाठी ASHTAM (विमानांना धोक्याची सूचना) जारी करून 'ज्वालामुखी राख ऑपरेशन मॅन्युअल'चे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही विमानाला इंजिनच्या कामगिरीत चढ-उतार किंवा केबिनमध्ये धूर/वास जाणवल्यास, तात्काळ माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वाहतूक विस्कळीत
मुंबईतून निघणाऱ्या विमानांसह दक्षिण भारतातून उड्डाण करणाऱ्या अनेक विमानांवर या राखेच्या ढगांचा परिणाम झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले, ज्यामुळे ती विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून वळवावी लागली. एका विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आज परिणाम कमी असला तरी, मंगळवारी परिस्थिती अधिक बिघडू शकते. जर ही राख दिल्ली आणि जयपूरवर जमा झाली, तर भारतीय हवाई वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी २४ तास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
प्रदूषण तज्ज्ञांचे मत
या राखेमुळे हवेतील प्रदूषण वाढेल की नाही, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हवामान विभागाने (IMD) फारसा परिणाम होणार नाही असे सांगितले असले तरी, एन्व्हायरो कॅटालिस्ट्स या थिंक-टँकचे संस्थापक सुनील दहिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, इथिओपियासारख्या दूरवरून आलेली ज्वालामुखीची राख, तसेच पंजाबमधील शेतीचा कचरा आणि कारखान्यांमधून निघणारा धूर या सगळ्यांमुळे या प्रदेशातील प्रदूषणाची पातळी तात्पुरती वाढू शकते. दिल्ली-एनसीआरमध्ये आधीच हवा 'गंभीर' स्तराच्या अगदी जवळ आहे (AQI 382), अशा वेळी राखेचा प्रवेश ही मोठी चिंतेची बाब आहे.
