15 डिसेंबर रोजी सकाळी पत्रौआ रोडवरील ईदगाहजवळील नाल्यात एका तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह आढळल्याने हे प्रकरण उघडकीस आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासात तो माणूस 35 वर्षीय राहुल असल्याचे उघड झाले, जो राजपुरा पोलीस स्टेशन परिसरातील गन्ना शहरातील रहिवासी जसवंतचा मुलगा होता. मृतदेहाच्या हातावर "राहुल" हे नाव गोंदवले होते, ज्यामुळे ओळख पटवणे सोपे झाले.
advertisement
मृत राहुलचे लग्न 15 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात चांदौसीतील मोहल्ला चुन्नी येथील रहिवासी रूबीशी झाले होते. या जोडप्याला 10 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा, अशी दोन अपत्य आहेत. राहुल हा बूट विक्रेता होता आणि 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याची पत्नी रुबीने 24 नोव्हेंबर रोजी चांदौसी पोलीस ठाण्यात राहुल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या पत्नीची भूमिका संशयास्पद वाटली. चौकशीदरम्यान, रुबी, तिचा प्रियकर अभिषेक आणि गौरव या आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या माहितीनंतर, पोलिसांनी घरातून बेड, स्कूटर, बॅग, टॉयलेट ब्रश, लोखंडी रॉड आणि इलेक्ट्रिक हीटरसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा मृताच्या 10 वर्षांच्या मुलीकडून झाला. तिने स्पष्ट केले की तिचे पालक अनेकदा भांडत असत आणि गौरव आणि अभिषेक नावाचे दोन पुरुष घरी येत असत. ते मुलांसाठी हॉटेलमधून चॉकलेट आणि जेवण आणत असत. मुलीच्या म्हणण्यानुसार, अभिषेक अनेकदा म्हणायचा, 'काही महिन्यांचीच गोष्ट आहे, मग तुझे वडील निघून जातील'.
घटनेच्या दिवशी मी आणि माझा भाऊ शाळेत होतो, असं मुलीने पोलीस तपासात सांगितलं. तसंच आम्ही जेव्हा अभिषेक आणि गौरवच्या घरी येण्याला विरोध करायचो तेव्हा आई आम्हाला धमकवायची, असंही मुलीने सांगितलं आहे. माझ्या वडिलांसोबत असं करणाऱ्या माझ्या आईला आणि त्या दोघांनाही फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मुलीने केली आहे. पोलीस आता राहुलचे उरलेले अवयव शोधण्याचं काम करत आहेत. लवकरच हा हत्याप्रकरणाचा उलगडा होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
