जितेंद्र जोशी मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तो मराठी चित्रपटांसोबतच आजवर अनेक हिंदी वेब सिरीजमध्ये झळकला आहे. पण उत्तम अभिनेता असणारा जितेंद्र अनेकदा सामाजिक बांधिलकी जपताना देखील दिसतो. जितेंद्रला आपण आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झालेलं पाहिलं आहे. ‘पाणी फाऊंडेशन’, ‘नाम’ यांसारख्या संस्थांसाठी त्याने काम केलंय. निसर्गाविषयी त्याची आत्मीयता तो प्रत्येक ठिकाणी मांडताना दिसतो. आताही जितेंद्रने निसर्गाला हानी पोहचवणाऱ्यांचे कान टोचले आहेत. त्याने महामार्ग निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
advertisement
जितेंद्रने या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदमरताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपण सुद्धा निर्वंश होऊन मारून टाकले जाणार आहोत. आताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहासोबत झोपी जाण्यासाठी.'
जितेंद्र जोशीने यापूर्वी देखील फटाक्यांमुळं होणारं वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्षतोड यासारख्या सामाजिक मुद्यांवर भाष्य करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
जितेंद्र जोशीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, नुकतंच तो नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' चित्रपटात तो झळकला होता. शिवाय ‘गोदावरी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं. नाळ 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता जितेंद्र जोशी लवकरच रावसाहेब या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृन्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात जितेंद्र एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.