नवी दिल्ली : महायुतीच्या जागावाटपांचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पेच सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही होती, पण नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. याआधीही नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे भाजपने विरोध केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल अजित पवारांना पत्रही लिहिलं होतं.
advertisement
नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येणार नसली तरी त्यांची मुलगी सना मलिक यांची उमेदवारी कायम राहणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूरमधून भाजपने राम सातपुतेंना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला.
दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे उपस्थित आहेत. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे घटकपक्ष जागांची अदलाबदल करणार आहेत. भाजप काही जागा राष्ट्रवादीला तसंच एकनाथ शिंदेंनी 2019 ला शिवसेनेने लढलेल्या काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
त्या जागांवर मुंबईत निर्णय
महायुतीच्या या बैठकीत तिढा असलेल्या अनेक जागांवर एकमत झालं आहे तर काही जागांवर अजूनही पेच कायम आहे. साधारणत: 5 ते 8 जागांवर एकमत होण्याची शक्यता कमी आहे, एकमत न झालेल्या या जागांवर मुंबईत शेवटी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.