पुणे : पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी धक्कादायक स्टेटस ठेवून ते बेपत्ता झाल्याने पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान बेपत्ता पोलीस हवालदार यांच्या बदलीचा आदेश News18 मराठीच्या हाती लागला आहे. बदली होऊन देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सोडले नसल्याने पोलीस हवालदार मानसिक तणावात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
advertisement
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे यांनी व्हाट्सएपवर स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मुलीच्या वाढदिवसाला भावनिक पोस्ट करून बेपत्ता झाले. पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान यवत ते शिक्रापूर दरम्यान निखिल रणदिवे यांची बदली झाली होती. मात्र त्यांना पोलिस निरीक्षक यांनी सोडले नाही त्यामुळे मानसिक त्रासामध्ये होते बदलीचा आदेश News18 लोकमतच्या हाती लागला आहे या आदेशात 30 मे 2025 ला बदली झालीय मात्र निखिल रणदिवे यांना सोडण्यात आले नाही असे स्पष्ट दिसत आहे.
वरिष्ठांवर गंभीर आरोप
दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस स्टेशनमध्ये हवालदार पदावर निखील रणदिवे कार्यरत होते. त्यांनी यवत स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या केडगाव येथील पोलीस चौकीमध्ये निखिल रणदिवे हे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. मागील वर्षभरापासून त्यांची बदली झाली नव्हती, त्यामुळे ते त्रस्त होते. तसा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटमध्ये केला आहे.
निखील रणदिवे यांनी नेमकं काय लिहिलं होतं पोस्टमध्ये?
निखिल रणदिवे यांची मागील काही दिवसांपूर्वी शिक्रापूर इथं बदली झाली होती. पण यवत पोलीस स्टेशनमधून रणदिवे यांना सोडण्यात आलं नव्हतं. रणदिवे यांनी आपल्या कुटुंबाला शिक्रापूर इथं शिफ्ट केलं होतं. पण स्टेशनवरून सोडण्यात येत नसल्यामुळे रणदिवे तणावाखाली होते. ५ डिसेंबर रोजी रणदिवे यांनी व्हॉट्सअपवर एक पोस्ट लिहिली. यात यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख हेच मागील १ वर्षांपासून सतत त्रास देत आहेत. माझ्या नाईलाज आहे. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत आहे. अशी पोस्ट टाकून रणदिवे बेपत्ता झाले आहे. रणदिवे हे स्टेटस ठेवल्यापासून त्यांचा मोबाईल बंद असून ते अद्यापपर्यंत मिळून आला नाही. यामुळे पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
