महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, विमाननगर आणि भवानी पेठेत डोअर टू गेट कचरा संकलन उपक्रम राबवला असता रस्त्यांवरील आणि पदपथांवरील कचरा जवळपास पूर्णपणे नाहीसा झाला आहे. नागरिकांनी घरातील कचरा सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत ठेवण्याची सवय अंगीकारल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा साचत नाही.
advertisement
या पद्धतीनुसार घराघरांतून कचरा निश्चित वेळेत उचलला जातो आणि त्याचवेळी संकलन वाहने तत्पर ठेवली जातात. त्यामुळे कचरा थांबून राहत नाही आणि दुर्गंधी निर्माण होत नाही. पूर्वी रस्त्यांच्या कडेला, चौकांत आणि पदपथांवर दिसणारे कचऱ्याचे ढीग आता पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून रस्त्यावर गुपचूप कचरा टाकण्याचे प्रकारही थांबले असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे.
अंमलबजावणीच्या काळात संकलनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कचरा वेचक आणि वाहनचालकांच्या हालचालींवर जीपीएस प्रणालीद्वारे थेट देखरेख ठेवण्यात आली. कोणतेही वाहन उशिरा पोहोचल्यास तत्काळ सूचना देऊन संकलनातील खंड भरून काढण्यात आला. या ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’मुळे फिडर पॉइंटजवळ निर्माण होणारे कचऱ्याचे ढीग आणि त्यातून येणारी दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी झाली.
कदम यांनी सांगितले की, या प्रयोगामुळे संबंधित परिसरात दृश्यस्वच्छतेत आश्चर्यकारक सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता या उपक्रमाचा दुसरा टप्पा म्हणून वाघोलीसह शहरातील इतर भागांमध्ये ही पद्धत लागू करण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे.
मनुष्यबळ, वाहने, मार्गरचना आणि देखरेख यंत्रणा या चार महत्त्वाच्या घटकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष पथके नेमली जाणार आहेत. या पथकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात ‘डोअर टू गेट’ संकलनाचा विस्तार केला जाणार असून, स्वच्छतेबाबत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती उपक्रमही हाती घेण्यात येणार आहेत.