पुणे : मावळ तालुक्यातील राजकारणात सध्या तापमान चांगलंच वाढलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि सगळेच पक्ष रणांगणात उतरलेत. आमदार सुनील शेळके एका वक्तव्याने संपूर्ण मावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची एकही जागा भाजपला देणार नाही, ठणकावून सांगितलं आहे. आता या वक्तव्यामुळे मावळ मधील महायुतीत काय घडामोडी होतील, हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
advertisement
मावळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण जाहीर झालं असून, यंदा महिला उमेदवारांना मोठं व्यासपीठ मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता आढावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे,
वक्तव्यामुळे मिठाचा खडा पडण्याची शक्यता
सुनील शेळके यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीत विविध चर्चा रंगू लागली आहे. वरिष्ठ पातळीवर महायुती असली तरी मावळमध्ये या वक्तव्यामुळे मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता मावळमध्ये राजकीय शतरंज सजली आहे. मावळ भाजप याबाबत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सुनील शेळके यांचं मावळमधील सर्व जागा राष्ट्रवादीकडेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण तापलं
वडगाव मावळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरलं आहे. या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांच्या महिला नेत्यांनी तयारीला वेग आला आहे. दरम्यान, भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून, स्थानिक पातळीवर महायुतीचं समीकरण जुळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, नगराध्यक्षपद कोणत्या महिला नेत्या कडे जाणार, याची चर्चा वडगाव शहरात रंगली आहे.