यशवंत कन्हेरे दर आठवड्याला मराठी भाषा प्रबोधनाचे उपक्रम राबवतात. बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून ते मुलांना मातृभाषेचे महत्त्व पटवून देतात. इतर भाषा जरूर शिका, मात्र मराठीचे स्थान आपल्या आयुष्यात कायम अग्रक्रमाचे असले पाहिजे, हा संदेश ते लहानग्यांच्या मनात रुजवत आहेत. विशेष म्हणजे, ज्यांना मराठी भाषा बोलता किंवा वाचता येत नाही, अशांनाही ते विनामूल्य मार्गदर्शन करून मराठी शिकवत आहेत.
advertisement
तुमचा जीव मोलाचा! पुण्यातली संस्था करतेय कौतुकास्पद काम, Video पाहून कराल सलाम
नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर यशवंत कन्हेरे यांनी स्वतःला मराठी भाषेच्या प्रबोधनासाठी वाहून घेतले आहे. बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून ते मुलांच्या मनावर मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत आहेत. मुलांना मराठी शाळेतच घाला असा संदेश देत ते पालकांनाही सातत्याने मार्गदर्शन करतात.
कन्हेरे यांचे हस्ताक्षर अत्यंत रेखीव आणि सुंदर आहे. आपल्या या सुंदर अक्षराच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तसेच अनेक थोर व्यक्तींची चरित्रे हस्तलिखित स्वरूपात लिहून काढली आहेत. त्यांनी लिहिलेली ही चरित्रे ते समाजातील नागरिकांना वाचनासाठी उपलब्ध करून देत असून, मराठी भाषेची गोडी नव्या पिढीत रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रभर फिरून मराठी भाषेचा प्रचार
यशवंत कन्हेरे हे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन मराठी भाषेबाबत प्रबोधन करत आहेत. मराठी भाषा किती महत्त्वाची आहे, मातृभाषेतून शिक्षण का गरजेचे आहे याबाबत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच शिक्षकांनाही मराठी भाषेचा आग्रहाने व प्रभावी पद्धतीने अध्यापन करण्याचा सल्ला देतात.
केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून मराठी भाषेचा प्रचार-प्रसार केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शाळांना भेट देत त्यांनी मातृभाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर अधोरेखित केले आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे.
बालसंस्कार वर्गातून मातृभाषेची गोडी
ज्या मुलांना मराठी भाषा अवगत नाही, अशा विद्यार्थ्यांना यशवंत कन्हेरे बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून मराठी शिकवतात. आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांमध्ये मातृभाषेबद्दल आत्मीयता निर्माण होत आहे.
दर रविवारी पिंपरी-चिंचवड परिसरात ते विनामूल्य बालसंस्कार वर्ग घेतात. या वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात मातृभाषेबद्दल तसेच देशाबद्दल आदर आणि प्रेम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या या कार्याची अनेक स्तरांवर दखल घेण्यात आली असून, विविध संस्थांकडून त्यांचा सन्मान व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.





