मावळ तालुका हा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गुलाबफुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील गुलाबांची केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशांतही मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने फुलांना मागणी चांगली आहे. परंतु वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दररोज देशभरातील बाजारपेठांमध्ये विमानाने जाणारी लाखो फुले पुणे विमानतळावरच पडून आहेत. दररोज मावळातून सुमारे 40 लाख गुलाबफुलांची वाहतूक होते. त्यापैकी सुमारे १० लाख गुलाब फुले एकट्या विमानाने विविध शहरांमध्ये जातात. किरकोळ बाजारात एका गुलाबाला २० रुपयांपर्यंत भाव मिळत असताना, वाहतूक थांबल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ५० लाख रुपयांचे फुलांचे नुकसान झाले आहे.
advertisement
वसंत ठाकरे या फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, दिल्ली, वाराणसी, लखनौ आणि गुवाहाटीसारख्या शहरांसाठीची विमानसेवा रद्द झाल्यामुळे त्यांचा माल विमानतळावरच खराब झाला आहे. यामुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान कोण भरून देणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशी बाजारपेठांमध्येही फुलांची मागणी थांबली आहे. मावळ तालुक्यातील आबासाहेब शिवलिंग आळगडे या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांची रोजची दोन हजार फुले परदेशात जातात, पण इंडिगोच्या सेवेमुळे त्या सर्व ऑर्डर रद्द झाल्या आहेत, तर आधी पाठवलेली फुलेही खराब झाली आहेत. एअरलाईन्सच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा थेट फटका बसला असून, ही परिस्थिती फार काळ टिकल्यास मावळच्या फुलशेती उद्योगाला मोठे नुकसान सोसावे लागेल.
