सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्याचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे यंदाचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज चार ते पाच हजार किलो शेवग्याची आवक होत असते. मात्र, सोमवारी केवळ ४०० ते ५०० किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक फक्त आंध्र प्रदेशातून झाली आहे. त्यामुळे दरही वाढले.
advertisement
Bajra Halwa : हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाऊन कंटाळलात? बनवा टेस्टी आणि हेल्दी हलवा, पाहा रेसिपी
गेल्या आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 प्रति किलो होता, तो आता थेट 500 रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्याने ही विक्रमी भाववाढ झाली आहे.
पुणे आणि मुंबईतील दाक्षिणात्य उपाहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत आहेत. शेवगा उष्ण असल्याने थंडीत गृहिणींकडून त्याला मोठी मागणी असते. मधुमेह आणि इतर आजारांसाठी शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर अलीकडे वाढला आहे. मात्र, या प्रचंड दरवाढीमुळे शेवग्याचा वापर करणाऱ्या गृहिणींना किमान महिनाभर हात आखडता घ्यावा लागणार आहे.
