महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात येत असून, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग उभारण्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून करण्यात येत आहे. चार मीटर रुंदीच्या या पादचारी पुलासाठी एकूण सहा कॉलम उभारले जाणार असून, त्यापैकी तीन कॉलमचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असून पुढील तीन महिन्यांत पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
पुणेकरांनो, श्वास घेताय की विष? 'त्या' 7 लाख गाड्यांमुळे आयुष्य होतंय कमी; सर्वेक्षणात मोठे खुलासे!
या पुलामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी पुणेरी मेट्रो अर्थात लाईन 3 थेट जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद आणि सुरक्षित बदल करता येणार आहे. विशेषतः आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील हजारो कर्मचाऱ्यांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोची चाचणी पूर्ण झाल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे. एप्रिलपर्यंत हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले, तरी शिवाजीनगर स्थानकावरील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यातील कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
दरम्यान, शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता हा मेट्रो दुवा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पादचारी पुलाच्या उभारणीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार असून पुणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.






