पुणे : शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. ओढ्याच्या पुलावरून जात असताना एका 30 वर्षीय तरुणाचा तोल जाऊन तो ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिरुर तालुक्यात जोरदार पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे परिसरातील नदी-नाले धोक्याच्या पातळीवर आले आहेत. सोमवारी दुपारी सुरज राजगुरु (वय ३०) हा तरुण निमगाव म्हाळुंगी येथील ओढ्याच्या पुलावर पाणी पाहण्यासाठी उभा होता. पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो ओढ्यात कोसळला. वेगवान प्रवाहामुळे तो काही क्षणातच दिसेनासा झाला.
advertisement
यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धावपळ करून मदतकार्य सुरू केले. मात्र पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे तरुणाला वाचवता आलं नाही. यानंतर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या रेस्क्यू टीमकडून बोटीसह शोधकार्य सुरू असून तरुणाचा मागोवा घेण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
दरम्यान, मुसळधार पावसामुळे ओढे-नाले धोकादायक पातळीवर आलेले असताना स्थानिक नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे नाले, ओढे व पूल परिसरात न जाण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
सतर्कतेच्या सूचना पाळण्याचे आवाहन
सुरज राजगुरु हा तरुण अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.ह. प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या सूचना पाळण्याचे आवाहन करूनही अनेक ठिकाणी नागरिक धोका पत्करून पाणी पाहण्यासाठी गर्दी करतात. परिणामी अशा दुर्घटना घडतात. निमगाव म्हाळुंगीतील ही घटना त्याचं ताजं उदाहरण ठरली आहे.
हे ही वाचा :