शिक्षकांच्या या आंदोलनाची तीन प्रमुख कारणं आहेत:
शिक्षक कपात (पदे कमी करणे): सरकारने नवीन नियमांनुसार केलेली 'संचमान्यता' यामुळे राज्यभरातील २० हजारांहून अधिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत, ज्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये नोकरी जाण्याची भीती आहे.
टीईटीची सक्ती: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, शिक्षकांना दोन वर्षांत टीईटी (TET) परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले जाऊ शकते.
advertisement
ऑनलाइन कामांचा ताण: शिक्षकांना अध्यापनाशिवाय अनेक ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांचा मोठा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.
महामोर्चाची रूपरेषा
शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन 'शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती' तयार केली आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा 'आक्रोश महामोर्चा' पुणे येथील नवीन जिल्हा परिषद कार्यालयापासून सुरू होईल आणि विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालय या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन संपेल.
अनेक संघटनांचा सहभाग
या मोर्चामध्ये प्राथमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना (OPS), शिक्षक भारती, मुख्याध्यापक संघ अशा प्राथमिक, माध्यमिक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रमुख संघटना सहभागी होणार आहेत. आंबेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी जिल्ह्यातील २८२ शाळांमधील सुमारे ११५० शिक्षक रजेवर राहून या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती दिली आहे.
शिक्षकांनी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होऊन मराठी शाळा आणि शिक्षकांचे हित जपण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
