आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. त्यासाठी राज्य शासनाचे आरटीई पोर्टल अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू आहे. शाळांची माहिती तपासणी, उपलब्ध जागांची खातरजमा, तसेच पालकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. मागील वर्षी पोर्टलवर तांत्रिक त्रुटी, लॉग-इन समस्या, अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी यामुळे पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यंदा अशा समस्या टाळण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
आरटीई कायद्यानुसार नर्सरी ते आठवीपर्यंतच्या वर्गांमध्ये खासगी विनाअनुदानित शाळांनी २५ टक्के जागा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना दिले जाते. त्यामुळे अनेक पालकांसाठी आरटीई ही दर्जेदार शिक्षणाची महत्त्वाची संधी ठरते.
सध्या आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पात्र खासगी शाळांची ऑनलाइन नोंदणी अंतिम टप्प्यात आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळा नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित शाळांना तातडीने नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवेशासाठी उपलब्ध शाळांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
दरम्यान, पालकांनी आरटीई प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आधीच तयार ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये आरटीई प्रवेश अर्ज, मुलाचे दोन फोटो, जन्म प्रमाणपत्र, पालक व मुलाचे आधार कार्ड, निवासस्थानाचा पुरावा, जात किंवा उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास), तसेच मागील शाळेचा दाखला यांचा समावेश आहे. याशिवाय घरापासून ठरावीक अंतरातील शाळांची माहिती आधीच पाहून पसंतीक्रम ठरवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून, त्यामुळे पालकांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
