बेपत्ता होण्याचे संभाव्य कारण काय?
सिंहगडाच्या खोल दरीत बेपत्ता झालेला गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहे. तो सध्या हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गौतमवर मोठे कर्ज होते. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा, असा संशय आहे.
गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत (महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी) सिंहगड पाहण्यासाठी आला होता. बुधवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी तानाजी कड्यावर असताना तो लघुशंकेला जातो असे सांगून दूर गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने मित्रांनी पोलिसांना तो कड्यावरून घसरून दरीत पडल्याची माहिती दिली होती.
advertisement
शोधमोहीम ते सीसीटीव्हीचा 'तो' दावा
गौतम गायकवाड हा तानाजी कड्यावरून पडल्याच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन दल आणि हवेली पोलीस कसून शोध घेत होते. मात्र, याच दरम्यान सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गौतम पळत आणि लपून जाताना दिसल्याचा दावा करण्यात आला. यामुळे तो दरीत पडला की त्याने बनाव रचला, या संदर्भात पोलीस तपास करत होते. आता त्याने हा बनाव रचला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांमुळे जीव वाचला
काल (रविवार, २४ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात काहीशी हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने शोध घेतला असता गौतम गायकवाड त्यांना जिवंत अवस्थेत आढळून आला. स्थानिकांनी त्याला बाहेर काढून गडावरील वाहनतळाच्या दिशेने आणले. हवेली पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
