अभिजात संगीताच्या प्रांतात हे निवेदन केवळ शब्दांचे सादरीकरण नसून, रसिक आणि कलाकार यांच्यातील संवेदनशील दुवा असतो. 33 वर्षांपूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी आनंद देशमुख यांच्यावर दाखवलेला विश्वास आजही अखंडितपणे पुढे सुरू आहे. पंडितजींनी दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ काम नव्हे, तर एक साधना आहे, असे भावनिक शब्दांत आनंद देशमुख यांनी आपल्या प्रवासाची आठवण सांगितली. शास्त्रीय संगीताच्या निवेदनाची एक विशिष्ट चौकट असते. सुगम संगीताप्रमाणे येथे शेरो- शायरी, कविता किंवा किस्स्यांची रेलचेल करता येत नाही.
advertisement
राग, ताल, कलाकारांची माहिती आणि रसिकांची संवेदना यांचा अचूक समतोल राखावा लागतो. या मर्यादांमध्ये राहून निवेदन रसिकांना आवडावे, हे मोठे आव्हान असते. मात्र, हीच मर्यादा आपल्याला अधिक जबाबदार बनवते, असे देशमुख सांगतात. 33 वर्षांच्या प्रवासात अनेक कसोटीचे क्षण आले. वेळेची शिस्त, कलाकारांच्या गरजा, रसिकांची अपेक्षा आणि अभिजात संगीतातील गांभीर्य यांचा मेळ घालणे सोपे नव्हते. तरीही, हे सवाईचे आनंद आहे, असे कौतुक जेव्हा रसिकांकडून ऐकायला मिळते, तेव्हा सर्व कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.
अभिजात संगीतातील हा निवेदनाचा विक्रम आता जागतिक व्यासपीठावर पोहोचला असून, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रसिक, कलाकार आणि आयोजकांसाठी हा क्षण निश्चितच अभिमानास्पद ठरणारा आहे.