डॉ. गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या 'ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण' या निवासस्थानी सकाळी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आज, ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधव गाडगीळ यांचे पश्चिम घाटाच्या जैवविविधतेवरील संशोधन जागतिक पातळीवर नावाजले गेले. २०११ मध्ये त्यांनी सादर केलेला 'गाडगीळ समितीचा अहवाल' हा भारताच्या पर्यावरणीय इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. पश्चिम घाटासारख्या संवेदनशील भागात होणारे अनिर्बंध बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्प भविष्यात विनाशकारी ठरतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी या अहवालातून दिला होता. अलीकडच्या काळात निसर्गाच्या कोपामुळे होणाऱ्या दुर्घटना पाहता, गाडगीळ यांनी दिलेला इशारा किती अचूक होता, याची प्रचिती येते.
advertisement
हार्वर्ड विद्यापीठापासून ते भारत सरकारच्या उच्च पदस्थ समित्यांपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. तरीही, त्यांनी नेहमीच स्वतःला "लोकांचा शास्त्रज्ञ" मानले. लोकांच्या सहभागाशिवाय पर्यावरण रक्षण होऊ शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) त्यांना २०२४ मध्ये 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते.
वैज्ञानिक शिस्त आणि सर्वसामान्य माणसाचा विकास यांचा समतोल कसा साधावा, याचा आदर्श त्यांनी आपल्या कामातून घालून दिला. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्रातील एका सुवर्णकाळाचा अंत झाला आहे.
