आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात पारंपारिक पद्धतीने तुळशी माळ निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सागर उपळकर यांचे तुळशीमाळ बनवण्याचे काम पिढ्यानपिढ्या सुरू आहे. आषाढी वारी जवळ असल्याने सर्वच तुळशीमाळ बनवणारे कारागीर व्यस्त आहेत. जवळपास 15 हजारहून अधिक तुळशीमाळ याठिकाणी बनविल्या जातात. पंढरपुरात मोठ्या प्रमाणात तुळशीची लागवड केली जाते. तुळशीचे पान शेतकरी मंदिरात आणतात, तर तुळशीच्या फांद्या या तुळशीमाळ बनवण्यासाठी तुळशीमाळ कारागिरांना दिल्या जातात.
advertisement
World Blood Day 2025: लग्न जुळवताना रक्तगट बघणं का गरजेचं? सारखा असल्यावर काय होतात परिणाम? Video
तुळशीच्या लहान-मोठ्या फांद्यांची छाटणी करून तुळशीमाळ बनविल्या जातात. तुळशीची एक माळ बनवण्यासाठी कमीत कमी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. पंढरपुरात प्रामुख्याने काशी कापडी समाजाचे कारागीर तुळशी माळ बनवण्याचे काम करतात. ही तुळशी माळ पारंपारिक पद्धतीने राहटावर हाताने बनवतात. वारीत आणि वारकऱ्यांसाठी तुळशीमाळेचे विशेष महत्त्व मानले जाते. विठुरायाला तुळस प्रिय आहे. वारकऱ्यांच्या गळ्यात विठ्ठलाचे नामस्मरण करत 108 मण्यांची माळ भक्तीचे प्रतीक मानले जाते. पारंपारिक पद्धतीने तयार होणाऱ्या या तुळशीमाळसमोर आता मेड इन चायना तुळशी माळेचे मोठे आव्हान समोर उभे राहिले आहे.
तुळशीमाळसारखीच दिसणारी मेड इन चायना माळ अलीकडच्या काळात बाजारात आली आहे. चायना तुळशीमाळ विकून वारकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. भाविकांच्या भावनेशी खेळण्याचे काम केले जात आहे. जुन्या जाणत्या वारकऱ्यांना तुळशी माळ आणि चायना माळ या दोघांमधील फरक लगेच दिसतो. पण नवीन वारकऱ्यांना हा फरक समजणे अवघड आहे. तुळशीमाळ ही हाताने बनवली जाते. माळ तयार झाल्यावर तिच्या मण्याला लहान छिद्र असते. तर लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्याला मोठे छिद्र असते. हा फरक लगेच जुन्या वारकऱ्यांना दिसून येतो.
तुळशीच्या लाकडापासून बनलेली ही माळ वारकऱ्यांचे दैवत असते. तुळस म्हणजे सात्त्विकता, मांगल्यता आणि पवित्रता असते. तुळशीमुळे घरातील वातावरण शुद्ध राहते व पाप नष्ट होतात अशी धार्मिक भावना आहे.





