या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाचा 18.4 ओव्हरमध्ये 125 रनवर ऑलआऊट झाला. अभिषेक शर्माने 37 बॉलमध्ये 68 रन केले तर हर्षित राणाने 35 रनची खेळी केली. अभिषेक आणि हर्षित वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला दोन आकडी स्कोअरही करता आला नाही. 32 रनवर टीम इंडियाचे 4 खेळाडू तर 49 रनवर 5 खेळाडू आऊट झाले होते. शुभमन गिल 4 रनवर, संजू 2 रनवर, कर्णधार सूर्यकुमार यादव 1 रनवर, तिलक वर्मा शून्य आणि अक्षर पटेल 7 रनवर आऊट झाले.
advertisement
पहिल्या 5 विकेट गेल्यानंतर अभिषेक आणि हर्षित यांच्यात 56 रनची पार्टनरशीप झाली, पण हर्षितची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय बॅटरनी रांग लावली. शिवम दुबे 4 रनवर, कुलदीप यादव शून्य आणि बुमराह शून्य रनवर आऊट झाले. तर वरुण चक्रवर्ती शून्य रनवर नाबाद राहिला.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
ऑस्ट्रलियाविरुद्धच्या या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या 4 खेळाडूंमुळे पराभव झाल्याचं वक्तव्य सूर्याने केलं आहे. 'तुमच्या पॉवर प्लेमध्येच पहिल्या 4 विकेट गेल्या असतील, तर पुनरागमन करणं खूप कठीण असतं. हेजलवूडने चांगली बॉलिंग टाकली. अभिषेक मागच्या काही काळापासून हेच करतोय, त्याला त्याचा खेळ माहिती आहे, त्याने स्वत:ची ओळख बनवली आहे. यात तो बदल करत नाहीये, ते चांगलं आहे. याचमुळे त्याला यश मिळालं आहे. भविष्यातही तो यावर कायम राहिल आणि यश मिळवेल', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
'पहिल्या सामन्यात आम्ही जे केलं ते आम्हाला तिसऱ्या सामन्यात करावं लागेल. पहिले बॅटिंग करत असू तर मोठा स्कोअर करावा लागेल आणि त्यानंतर रन रोखाव्या लागतील', अशी प्रतिक्रिया सूर्याने दिली आहे. सीरिजची तिसरी टी-20 मॅच रविवार 2 नोव्हेंबरला होणार आहे.
