या सामन्यात शतक केल्यानंतरही जेमिमाने सेलिब्रेशन केलं नाही. सामन्यानंतर तिने याचं कारण सांगितलं आहे. आज 50 किंवा 100 महत्त्वाचे नव्हते, तर टीमला जिंकवून देणं आणि शेवटपर्यंत तिकडे उभं राहणं गरजेचं होतं. मागच्या वर्ल्ड कपवेळी मला टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. यंदाच्या स्पर्धेत मला भीती होती, मी संपूर्ण स्पर्धेत रोज रडत होते, पण येशूने मला पुढे नेलं. मी माझ्या आईचे, वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. मागचे चार महिने खूप कठीण होते, पण हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया जेमिमाने या विजयानंतर दिली आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमधली पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर जेमिमाने स्मृती मंधानाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण स्मृतीला वादग्रस्त आऊट दिलं गेलं. यानंतर जेमिमाने हरमनप्रीतसोबत 167 रनची पार्टनरशीप केली. वर्ल्ड कपच्या इतिहासातला कोणत्याही टीमचा नॉक आऊट मधला हा सगळ्यात मोठा विजय आहे.
नवा विजेता मिळणार
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, त्यामुळे स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कोणत्याच महिला टीमला आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली वर्ल्ड कप फायनल रविवारी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
