ठाण्यातील घोडबंदर मार्ग हा मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्याचबरोबर मुंबई, वसई, विरार, मिरा रोड तसेच भाईंदर या भागांकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची संख्याही मोठी आहे. मात्र वाहनांच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असून येथे अनेक वळणे तसेच चढ-उतार आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
नवी मुंबईतून गुजरातला स्पेशल विमानसेवा, या शहरासाठी रोज उड्डाण, वेळापत्रक पाहिलं का?
या समस्येवर उपाय म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा पर्याय पूर्वी विचाराधीन होता. मात्र रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्यामुळे रस्त्याचा विस्तार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पर्यायी उपाय म्हणून गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन या घाट विभागात भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत गायमुख ते फाउंटन हॉटेल या सुमारे ५.५ किलोमीटरच्या अंतरात प्रत्येकी ३.५ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे उभारले जाणार आहेत. हे बोगदे सहा पदरी असणार असून वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यातून वसई, विरार, मिरा रोड आणि भाईंदरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
भुयारी मार्गाच्या निर्मितीमुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.






