या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मीर यार बलोच यांनी बलूच इतिहास, सध्याचा संघर्ष, आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका, महिलांचा वाढता सहभाग, CPEC, तसेच भारतासोबतच्या संभाव्य संबंधांबाबत आपल्या संघटनेचा आणि चळवळीचा दृष्टिकोन मांडला आहे.
प्रश्न: पाकिस्तानच्या लष्कराकडून बलूच जनतेवर होत असलेले अत्याचार; जसे जबरदस्तीने गायब करणे, मशिदींना नुकसान पोहोचवणे, संसाधनांचे शोषण आणि अमानुष हिंसा याकडे आपण कसे पाहता?
advertisement
मीर यार बलोच:
आम्ही सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करत आलो आहोत. स्वतःला इस्लामचा स्वयंघोषित रक्षक मानणारा पाकिस्तान प्रत्यक्षात इस्लाम आणि मुसलमानांचा सर्वात मोठा शत्रू आहे. बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानने तोफा, गोळे आणि बॉम्बफेकीद्वारे थेट जवळपास चाळीस मशिदींना लक्ष्य केले आहे. यामध्ये बलूचिस्तानचे तत्कालीन शासक मीर अहमद यार खान यांच्या राजवाड्यातील ऐतिहासिक मशिदीचाही समावेश आहे. आजही त्या मशिदीवर टँकने डागलेल्या गोळ्यांचे ठसे स्पष्ट दिसतात, जे पाकिस्तानच्या दहशतवाद आणि क्रौर्याचे ठोस पुरावे आहेत.
पाकिस्तानचे मुहम्मद अली जिन्ना हे ब्रिटिश समर्थित मोहरे होते. त्यांनी 1947 मध्ये भारताच्या फाळणीचा कट रचला आणि 27 मार्च 1948 रोजी स्वतंत्र असलेल्या बलूचिस्तान राज्यावर बेकायदेशीर आणि जबरदस्तीने कब्जा केला. बलूचिस्तानवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या वेळी आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषतः ब्रिटन, या गुन्ह्यात सहभागी होता. पाकिस्तानने बलूचिस्तानच्या समृद्ध आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूमीवर लष्करी हल्ला करून कब्जा केला नसता, तर पाकिस्तान आपल्या जन्मानंतर एका वर्षाच्या आतच संपुष्टात आला असता किंवा भारताकडे माफी मागून पुन्हा विलीन होण्यासाठी विनवणी केली असती किंवा अंतर्गत फाटाफुटीत पूर्णपणे नष्ट झाला असता.
हेच तथ्य पाकिस्तानच्या या खोट्या दाव्याला उघडे पाडण्यासाठी पुरेसे आहे की, 27 मार्च 1948 रोजी बलूचिस्तानच्या शासकाने स्वेच्छेने पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात पाकिस्तानने टँक, तोफा आणि बंदुकांच्या जोरावर बलूचिस्तानच्या शासकावर सह्या करण्यासाठी दबाव टाकला. या जबरदस्तीच्या कब्ज्यानंतर त्यांना तब्बल 14 वर्षे पंजाबमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले.
पाकिस्तानच्या या बेकायदेशीर कब्ज्याविरोधात बलूच शासक अहमद यार खान यांचे धाकटे भाऊ आणि त्या काळातील मकरानचे गव्हर्नर प्रिन्स अब्दुल करीम बलूच यांनी हजारो बलूच लढवय्यांसह सशस्त्र विरोध केला. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, ब्रिटनचे लाडके असलेल्या मुहम्मद अली जिन्ना यांनी बलूचिस्तानला पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा जो प्रस्ताव दिला होता, तो स्वतंत्र बलूच संसदेतल्या वरच्या आणि खालच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने फेटाळून लावला होता.
बलूच संघर्षाचा उद्देश या प्रदेशाला सततच्या युद्धापासून वाचवणे हाच आहे. उद्या बलूचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, तर संपूर्ण जग या निर्णयाचे स्वागत करेल. कारण त्यानंतर बलूचिस्तानमधून लुटलेली संपत्ती पाकिस्तानला धार्मिक दहशतवादी गटांना निधी देण्यासाठी वापरता येणार नाही. एकदा पाकिस्तानच्या लष्कराचा बलूचिस्तानच्या प्रचंड संसाधनांवरील बेकायदेशीर ताबा संपला, की जगात खऱ्या अर्थाने शांततेचा काळ सुरू होईल.
प्रश्न: पाकिस्तानला जबाबदार धरण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणती पावले उचलली पाहिजेत?
मीर यार बलोच:
आंतरराष्ट्रीय समुदायाने बलूचिस्तान प्रजासत्ताकामध्ये सुरू असलेल्या गंभीर मानवी हक्क उल्लंघनांकडे आणि बलूच नरसंहाराच्या सत्यापित प्रकरणांकडे तात्काळ लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानी बाह्य शक्तींमार्फत दशकानुदशके जबरदस्तीने लोकांना गायब करणे, न्यायबाह्य हत्या आणि छळ सुरू आहे. पाकिस्तानच्या लष्कराने डिसेंबर 2025 मध्ये स्वतः मान्य केले की, 2025 मध्ये दररोज सरासरी 200 लष्करी ऑपरेशन्स करण्यात आली आणि एकट्या 2025 या वर्षात एकूण 90,000 ऑपरेशन्स करण्यात आले.
रस्त्याच्या कडेला फाशी देणे, विरोध दडपण्यासाठी इंटरनेट बंद करणे अशा अमानुष कृतींमुळे तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली आहे. बलूचिस्तानची नैसर्गिक संसाधने वेगाने लुटून पाकिस्तान आपली दहशतवादी यंत्रणा चालवण्यासाठी जिहादी आणि अतिरेकी गटांना निधी पुरवत आहे आणि त्याच वेळी बलूच जनतेचा संहार करत आहे.
सर्वप्रथम पाकिस्तानने बलूचिस्तानमधील नद्या आणि भूभागातून आपले सर्व सैनिक मागे घ्यावेत आणि पहिल्या दिवसापासूनच बलूच असेंब्ली आणि जनतेने केलेल्या कब्ज्याच्या नकाराचा सन्मान करावा. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी शांततापूर्ण आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या छळ आणि अंधाधुंद हिंसेचा निषेध केला आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याचा संपूर्ण सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.
या परिस्थितीत, प्रदेश सुरक्षित करण्यासाठी, बलूचिस्तान प्रजासत्ताकाला स्वतःचे लष्कर, नौदल आणि हवाई दल उभारण्यासाठी मदत करण्यासाठी आणि पाणबुड्या, लढाऊ विमाने, टँक आणि क्षेपणास्त्रे यांसारखी लष्करी साधने बलूच नियंत्रणाखाली हस्तांतरित करण्यासाठी तात्काळ संयुक्त राष्ट्रांचे शांतता मिशन तैनात केले पाहिजे.
पाकिस्तानी सैन्य माघारी गेल्यानंतर बलूचिस्तान प्रजासत्ताक स्वतःचे चलन, व्हिसा आणि पासपोर्ट जलदगतीने जारी करू शकेल, ज्यामुळे सार्वभौमत्वाला बळ मिळेल. त्याचबरोबर 1948 पासून आतापर्यंत 40,000 लोकांच्या जबरदस्तीने गायब होण्याच्या आणि दोन लाखांहून अधिक बलूच लोकांच्या हत्यांच्या दस्तऐवजीकृत अत्याचारांना पाकिस्तानला सामोरे जावे लागेल.
प्रश्न: बलूच लोकांच्या ऐतिहासिक मुळांबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता का? आणि हा इतिहास आजच्या स्वातंत्र्यलढ्याला कसा आकार देतो?
मीर यार बलोच:
गेल्या जवळपास आठ दशकांपासून बलूचिस्तान आणि पाकिस्तान युद्धाच्या स्थितीत आहेत. कब्जा करणाऱ्या पाकिस्तानकडे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज टँक, लढाऊ विमाने, तथाकथित अण्वस्त्रे, दहा लाख सैनिकांची नियमित सेना, तसेच हवाई दल आणि नौदल आहे. मात्र एक महत्त्वाचे सत्य असे आहे की, पाकिस्तानकडे बलूच जनतेचा कोणताही जनादेश किंवा पाठिंबा नाही.
ते आमची जमीन, आमचा भूगोल नीट ओळखत नाहीत. त्यांना आमची भाषा, इतिहास, परंपरा आणि रीतिरिवाजांची समज नाही. तसेच बलूच राष्ट्राची खरी ताकद काय आहे, याचीही त्यांना जाणीव नाही.
म्हणूनच जर बलूच राष्ट्राला लढाऊ विमाने, टँक आणि इतर लष्करी क्षमता मिळाल्या, तर पाकिस्तान एका आठवड्याच्या आतच बलूच जनतेसमोर शरणागती पत्करेल. कारण बलूच जनता पाकिस्तानला जबरदस्तीने कब्जा करणारी सत्ता मानते, तर बलूच स्वातंत्र्य सेनानींना आपले मुक्तिदाते, रक्षक आणि हितचिंतक मानते. आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानला खूश ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी.
इतिहास अशा अनेक राष्ट्रांनी भरलेला आहे, ज्यांनी परकीय अधिपत्य आणि कब्ज्याला विरोध केला आणि अखेरीस वैध स्वातंत्र्यलढ्यांच्या माध्यमातून आपली सार्वभौमता पुन्हा मिळवली. अलीकडच्या इतिहासात भारताने ब्रिटिश सैन्याचा पराभव केला, अल्जेरियाने फ्रेंच वसाहतवाद संपवला, व्हिएतनामने दीर्घकाळ चाललेले परकीय लष्करी हस्तक्षेप निष्फळ ठरवले, बांगलादेशने पाकिस्तानच्या कब्ज्यातून मुक्ती मिळवली, पूर्व तिमोरने दशकानुदशके चाललेले इंडोनेशियन नियंत्रण संपवले, इरिट्रियाने इथिओपियन सैन्याला हुसकावून लावले, दक्षिण सुदान खार्तूमच्या वर्चस्वातून मुक्त झाला, झिंबाब्वेने वसाहतवादी सत्ता उलथवून टाकली, नामिबियाने दक्षिण आफ्रिकेचा कब्जा संपवला, मोझांबिकने पोर्तुगीज वसाहतवादी सैन्याला हाकलून दिले, तसेच एस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया या बाल्टिक राष्ट्रांनी सामूहिकरित्या सोव्हिएत कब्ज्यातून मुक्ती मिळवली.
प्रत्येक प्रकरणात आंतरराष्ट्रीय समुदायाने अखेरीस एक साधे सत्य मान्य केले—कोणत्याही परकीय शक्तीला कोणत्याही जनतेवर त्यांच्या इच्छेविरुद्ध राज्य करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि इराणलाही बंदुकीच्या जोरावर बलूचिस्तानच्या जनतेवर राज्य करण्याचा कोणताही अधिकार नाही.
प्रश्न: 31 जानेवारी 2026 रोजी बलूचिस्तानातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावरील BLA हल्ल्यांमागे कारणे काय असू शकतात?
मीर यार बलोच:
बलूच जनतेने नेहमीच पाकिस्तानच्या कब्ज्यातून मुक्त होण्यासाठी संघर्ष केला आहे. ते स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतात आणि आपला इतिहास, संस्कृती व ओळख जपण्यासाठी परकीय आणि बाह्य शक्तींविरुद्ध आपल्या लोकांचे रक्षण करत आहेत.
पाकिस्तानच्या लष्कराच्या मीडिया शाखेने, ISPR ने आणि बलूचिस्तानातील त्यांच्या कठपुतळी प्रतिनिधींनी स्वतः माध्यमांमध्ये कबूल केले आहे की, गेल्या एका वर्षात बलूचिस्तानमध्ये 2025 साली तब्बल 90,000 लष्करी ऑपरेशन्स करण्यात आले. या कबुलीजबाबाचा अर्थ असा होतो की, या हजारो ऑपरेशन्सदरम्यान एका वर्षात लाखो लोकांना अटक करून जबरदस्तीने गायब करण्यात आले आणि अनेकांना ठार मारण्यात आले.
हे आकडे आमच्या म्हणण्याला दुजोरा देतात की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यांसमोर बलूचिस्तानमध्ये एका संपूर्ण राष्ट्राचा नरसंहार केला जात आहे. फक्त आणि फक्त कारण बलूचिस्तानकडे खरबो डॉलर्सची संसाधने आहेत, तो प्रदेशात शांतता इच्छितो आणि पाकिस्तानच्या एकाधिकार व कब्ज्याला विरोध करतो.
बलूच स्वातंत्र्य सेनानी आपल्या लोकांचे संरक्षण करत आहेत. जेव्हा जेव्हा एखादे राष्ट्र गुलामगिरी किंवा कब्ज्याला सामोरे जाते, तेव्हा ते विरोध करतेच. आणि कोणालाही आपल्या आत्मसंरक्षणाच्या हक्कापासून वंचित करता येत नाही.
प्रश्न: आसिफा मेंगल, हवा बलूच यांसारख्या अधिकाधिक बलूच महिला पाकिस्तानी सैन्याविरुद्ध फिदायीन लढवय्ये का बनत आहेत?
मीर यार बलोच:
सध्या कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने सुमारे दोनशे बलूच महिलांना जबरदस्तीने अगवा करून गुप्त नजरकैद केंद्रांमध्ये छळले आहे. डॉ. महरंग बलूच, बेबो बलूच, गुलजारी बलूच यांच्यासह जवळपास 40,000 बलूच लोक पाकिस्तानच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या बंद आहेत.
बलूच महिलांना पाकिस्तानी सैन्याकडून लैंगिक अत्याचारांनाही सामोरे जावे लागत आहे. बलूच परंपरा आणि संस्कृतीत महिलांना अत्यंत पवित्र आणि सन्माननीय मानले जाते. जेव्हा त्या स्वतःच्या घरातही सुरक्षित राहत नाहीत, तेव्हा पाकिस्तानी सैन्याकडून बलात्कार होण्याऐवजी आणि मारले जाण्याऐवजी, स्वतःच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि इतर बलूच माता-भगिनींच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घेणे अधिक योग्य वाटू लागते.
बलूच महिलांनी शस्त्र हाती घेणे ही काही नवीन बाब नाही. यामागे दीर्घकाळ चाललेला छळ, अत्याचार आणि क्रौर्याचा इतिहास आहे.
2019 मध्ये बलूचिस्तान विद्यापीठात घडलेल्या घोटाळ्यात, फ्रंटियर कॉर्प्स (FC) आणि ISI शी संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिला वसतिगृह, स्वच्छतागृहे आणि खासगी जागांमध्ये गुप्त कॅमेरे लावले होते. अहवालांनुसार या कॅमेऱ्यांमधून सुमारे 5,000 फुटेज रेकॉर्ड करण्यात आली, ज्याचा वापर विशेषतः बलूच विद्यार्थिनींना लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आला. या भीषण गुन्ह्यात सामील लष्करी कर्मचाऱ्यांवर भ्रष्ट कायदेशीर यंत्रणेमुळे कोणतीही कारवाई झाली नाही.
फुटेज लीक झाल्यानंतर संपूर्ण कॅम्पस असुरक्षित बनला. हजारो बलूच विद्यार्थिनींनी भीतीपोटी विद्यापीठ सोडले. ISI, मिलिटरी इंटेलिजन्स आणि FC च्या देखरेखीखाली चालणाऱ्या प्रशासनामुळे पालकांनी आपल्या मुलींना विद्यापीठातून काढून घेतले. आज शिक्षणसंस्था शिकण्याची केंद्रे न राहता छावण्यांसारख्या दिसतात.
प्रश्न: 31 जानेवारीच्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी 145 पेक्षा जास्त BLA लढवय्यांना ठार केले. या दाव्यांकडे आपण कसे पाहता?
मीर यार बलोच:
बलूच कौम ही सन्मानप्रिय कौम आहे. बलूच डिफेन्स आणि सिक्युरिटी फोर्सेस बलूचिस्तानच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण करतात. ते आपल्या शहीदांची संपूर्ण माहिती, छायाचित्रांसह, अभिमानाने माध्यमांना देतात. कारण ते पाकिस्तानच्या लष्करासारखे भाडोत्री सैनिक नाहीत आणि पैशासाठी जीव देणारेही नाहीत.
पाकिस्तान जे आकडे “बंडखोर” ठार केल्याचे सांगतो, ते प्रत्यक्षात पाकिस्तानच्या युद्धगुन्ह्यांना झाकण्यासाठी वापरले जातात. जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य समर्थक बलूच फौजा पाकिस्तानच्या कब्जा करणाऱ्या सैन्याला मोठे नुकसान पोहोचवतात, तेव्हा पाकिस्तान आपले अपयश लपवण्यासाठी आधीच अगवा करून तुरुंगात डांबून ठेवलेल्या बलूच लोकांना बाहेर काढतो आणि बनावट चकमकींमध्ये ठार मारतो.
ज्यांची अटक झाल्याची माहिती पाकिस्तान स्वतःच्या न्यायालयांनाही देत नाही, अशा कैद्यांना ठार मारणे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या मानवी हक्क कायद्यांचे उघड उल्लंघन आहे.
प्रश्न: बलूच राष्ट्रवादी भारत किंवा इतर कोणत्याही देशाकडून मिळणाऱ्या मदतीला उपयुक्त किंवा आवश्यक मानतात का? आणि ती मदत कशा स्वरूपाची असू शकते?
मीर यार बलोच:
भारत आणि बलूचिस्तान या दोन्ही देशांमध्ये संपूर्ण प्रदेशात आर्थिक परिवर्तन, तांत्रिक क्रांती आणि दीर्घकालीन शांतता घडवून आणण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे. आम्हाला असे वाटते की नवी दिल्लीने बलूचिस्तानसोबतचे कूटनीतिक, राजकीय आणि इतर प्रकारचे सहकार्य अधिक खुलेपणाने मांडले पाहिजे.
बलूचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते ह्यरब्यार मर्री यांना भारताने आमंत्रित करून दीर्घकालीन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करावी. ईराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बलूच डायस्पोरा या सर्व ठिकाणी बलूच जनतेमध्ये त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यांच्याकडे बलूच राष्ट्राला एकत्र आणण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे.
जर पाकिस्तान पाश्चिमात्य देशांमध्ये आणि मुस्लिम जगतात बलूचिस्तानच्या भूगोल आणि संसाधनांचा वापर करून लॉबिंग करत असेल, तर भारत थेट बलूच जनतेशी ज्या या भूमीच्या आणि संसाधनांच्या खऱ्या मालक आहेत संवाद का साधत नाही?
बलूच जनतेला मनापासून वाटते की भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलूचिस्तानवर स्पष्ट विदेश धोरण जाहीर करावे, आणि त्याची सुरुवात बलूचिस्तानचे दूतावास उघडण्यास परवानगी देऊन करावी.
बलूच लोकांना स्वतःची सेना उभारण्यात अडचण नाही. त्यांनी सुमारे पाच लाख सैनिकांची एकसंध, नियमित सेना उभारण्याचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण केले आहे. मात्र कोणत्याही सेनेला संरक्षण उपकरणे आणि पुरेसा बजेट लागतो, जो सध्या आमच्याकडे नाही. परंतु एकदा आमचा ताबा तेलक्षेत्रे, सोने, तांबे आणि इतर दुर्मिळ खनिज खाणींवर पूर्णपणे प्रस्थापित झाला, की आम्ही आज आम्हाला मदत करणाऱ्या देशांनाही मदत करू शकू.
आज बलूच राष्ट्र केवळ दगड आणि काठ्यांच्या साहाय्याने शत्रूशी लढत आहे. जर आवश्यक संरक्षण शस्त्रे मिळाली, तर पाकिस्तान एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बलूचिस्तानमध्ये टिकू शकणार नाही.
प्रश्न: चीन–पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (CPEC) विशेषतः ग्वादर बंदरासारख्या बलूचिस्तानमधील प्रकल्पांबाबत आपले मत काय आहे? हे प्रकल्प स्थानिक विकासासाठी आहेत की शोषणासाठी?
मीर यार बलोच:
बलूच जनतेने CPEC ला सातत्याने विरोध केला आहे. आम्ही त्याला बीजिंगचा लष्करी प्रकल्प, 1948 च्या जबरदस्तीच्या कब्ज्याचा विस्तार आणि औपनिवेशिक शोषणाचे साधन मानतो. हा विरोध आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैध आहे, कारण बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट आहे.
इतिहासात अनेक देशांनी अशा शोषणकारी औपनिवेशिक प्रकल्पांना विरोध केला आहे. भारतातील 1855 चा संथाल उठाव ब्रिटिश शोषणाविरोधात होता. फिजीतील भारतीय मजुरांनी 1907 मध्ये ब्रिटिश वसाहतवादी व्यवस्थेविरोधात आंदोलन केले. 1680 मधील पुएब्लो उठावात स्पॅनिश वसाहतवाद्यांना हुसकावून लावण्यात आले. अशाच प्रकारे बलूचिस्तानचा CPEC विरोधही वैध आहे.
प्रश्न: पाकिस्तान भारतावर BLA आणि इतर बलूच गटांना मदत केल्याचा आरोप करतो आणि त्यांना “फितना-अल-हिंदुस्तान” म्हणतो. आपण हे आरोप कसे पाहता?
मीर यार बलोच:
भारताशी आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी पातळीवर स्पर्धा करण्याची क्षमता पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बलूच स्वातंत्र्य चळवळीला भारताची मदत असल्याचा आरोप करणे.
आम्ही स्पष्टपणे सांगतो की सध्या आम्हाला नवी दिल्लीकडून कोणतीही प्रत्यक्ष मदत मिळत नाही. मात्र आम्ही नैतिक, राजकीय आणि कूटनीतिक पाठिंब्यासाठी खुलेपणाने विनंती केली आहे. आम्ही “फितना-उल-हिंदुस्तान” हा शब्द ठामपणे नाकारतो. आम्ही 9,000 वर्षांचा इतिहास असलेले स्वतंत्र राष्ट्र आहोत—मेहरगड संस्कृतीचे वारसदार.
आम्ही दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानकडून कोणतेही प्रमाणपत्र स्वीकारणार नाही. आम्ही ‘रफीक-उल-हिंदुस्तान’ म्हणजे भारताचे मित्र आहोत, कारण कट्टर पाकिस्तान अस्तित्वात येण्याआधीच आम्ही होतो.
प्रश्न: सातत्याने होत असलेल्या दमनाच्या पार्श्वभूमीवर बलूचिस्तानमधील हिंसा आणि सशस्त्र संघर्षाची दिशा काय असेल?
मीर यार बलोच:
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी बलूचिस्तानमध्ये सैन्यसंख्या वाढवण्याची धमकी दिली आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आजही सुमारे चार लाख पाकिस्तानी सैनिक बलूचिस्तानमध्ये तैनात आहेत. अब्जावधी रुपये खर्च करूनही ते अपयशी ठरले आहेत.
जर पाकिस्तान नरसंहार तीव्र करण्यासाठी आणखी सैन्य पाठवत असेल, तर बलूच राष्ट्र आपल्या आत्मसंरक्षणासाठी आणि भूमीच्या रक्षणासाठी तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल.
पाकिस्तानने बलूचिस्तानच्या 66 टक्के भूमीवर कब्जा केला आहे आणि त्यातील 20 टक्के भाग बेकायदेशीरपणे पंजाबमध्ये विलीन केला आहे. आम्ही लवकरच हे सर्व प्रदेश पुन्हा बलूचिस्तान प्रजासत्ताकात समाविष्ट करू. हा संघर्ष संसाधनांच्या वाट्यासाठी नाही, कारण मालक स्वतःच्या मालमत्तेत हिस्सा मागत नाही. हा संघर्ष परकीय कब्ज्याच्या समाप्तीसाठी आणि स्वदेशी जनतेला स्वतःचे भविष्य ठरवण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे.
