इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या खनिजसंपन्न बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा हिंसाचार मानला जात आहे. बंडखोर गटांनी सुरक्षा दलांबरोबरच सामान्य नागरिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.
पाकिस्तानचे कनिष्ठ गृहमंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी हल्लेखोर सामान्य नागरिकांसारखे कपडे घालून रुग्णालये, शाळा, बँका आणि बाजारपेठांमध्ये घुसले. “प्रत्येक ठिकाणी त्यांनी दुकानदार आणि सामान्य लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. काही ठिकाणी नागरिकांना मानवी ढाल म्हणूनही वापरण्यात आले,” असे ते म्हणाले.
advertisement
या हल्ल्यांची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) स्वीकारली आहे. ‘हेरोफ’ किंवा ‘ब्लॅक स्टॉर्म’ नावाने सुरक्षा दलांविरोधात राज्यभर समन्वयित कारवाई केल्याचा दावा संघटनेने केला आहे.
प्रांतिक राजधानी क्वेटामध्ये हल्ल्यानंतरची दृश्ये भीषण होती. पोलीस ठाण्याबाहेर जळालेली वाहने, गोळीबाराने छिन्नभिन्न झालेले दरवाजे आणि पिवळ्या टेपने बंद केलेले रस्ते दिसत होते. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी गस्त वाढवली असून अनेक भागांत हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सरफराज बुगटी यांनी सांगितले की, या हल्ल्यांत 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा मृत्यू झाला. लष्कराच्या माहितीनुसार शनिवारी 92 तर शुक्रवारी 41 दहशतवादी ठार झाले.
“या प्रकारच्या मोठ्या कारवाईची योजना आखली जात असल्याची माहिती आम्हाला आधीच मिळाली होती. त्यामुळे एक दिवस आधीच प्रतिबंधात्मक कारवाया सुरू करण्यात आल्या,” असे बुगटी म्हणाले. अल्प काळात इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार क्वेटा, ग्वादर, मस्तुंग आणि नोश्की या जिल्ह्यांत जवळपास एकाच वेळी हल्ले करण्यात आले. सशस्त्र हल्लेखोरांनी फ्रंटियर कॉर्प्सच्या मुख्यालयासह सुरक्षा ठिकाणांवर गोळीबार केला, आत्मघातकी हल्ल्यांचा प्रयत्न केला आणि काही शहरी भागांत रस्ते अडवले. यानंतर लष्कर, पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकांनी मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली.
