नागरी वस्त्यांवर हल्ला, जीवितहानीचा आकडा वाढण्याची भीती
तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिका यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना आणि सीमावर्ती भागांना लक्ष्य केले. 'टोलो न्यूज'च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
पाकिस्तानच्या हल्ल्यावर तालिबान संतप्त...
ईदच्या तोंडावर आणि रमजानच्या शेवटच्या दिवसांत झालेल्या या हल्ल्यामुळे तालिबान प्रशासन प्रचंड संतापले आहे. "हा हल्ला केवळ अन्यायकारक नसून मानवी आणि नैतिक मूल्यांची पायमल्ली करणारा आहे," अशा शब्दांत मुजाहिद यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले. अफगाणिस्तान या हल्ल्याकडे दुर्लक्ष करणार नाही आणि योग्य वेळी या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा तालिबानने दिला आहे.
