भारताने आपल्या सघ्या कूटनीतीचा वापर करून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. सौदी अरेबियातून कच्चं तेल घेऊन निघालेलं 'शेनलोंग' (Shenlong) हे जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात पोहोचले आहे. भारताचा ध्वज असणाऱ्या टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करण्यास इराणने मंजुरी दिली आहे.
जयशंकर यांचा 'तो' फोन ठरला गेमचेंजर...
मंगळवारी १० मार्च रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली होती. इराणने आधीच जाहीर केलं होतं की, चीनशिवाय इतर कोणत्याही देशाच्या जहाजाला ते या मार्गावरून जाऊ देणार नाहीत. मात्र, जयशंकर यांनी इराणसोबत असलेल्या भारताच्या ऐतिहासिक मैत्रीचा दाखला देत भारतीय जहाजाच्या सुरक्षेची खात्री करून घेतली. या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांत हे जहाज सुरक्षितपणे मुंबईत दाखल झालं.
advertisement
इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनेंची हत्या झाल्यानंतर भारताने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. इराणवरील हल्ल्याचाही निषेध केला नव्हता. याउलट इस्रायल आणि इराणे हल्ले केलेल्या आखाती देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींनी फोन वरून चर्चा केली होती. त्यामुळे भारत-इराण संबंधात तेढ निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विरोधकांनीदेखील सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी इराण दूतावासात भेट देऊन खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. त्यानंतर भारत-इराणमध्ये चर्चा सुरू झाल्याचे चित्र दिसले.
मुंबईत 'शेनलोंग'चं जोरदार आगमन
बुधवारी दुपारी १ वाजता हे तेल टँकर मुंबई बंदरात पोहोचले आणि संध्याकाळी ६ वाजता त्याला ‘जवाहर द्वीप’वर बर्थ करण्यात आले. या जहाजात तब्बल १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चं तेल आहे, जे आता माहुल येथील रिफायनरींमध्ये पाठवलं जाईल. या जहाजावर भारत, पाकिस्तान आणि फिलीपीन्सचे एकूण २९ कर्मचारी आहेत.
युद्ध सुरू झाल्यापासूनचं पहिलं जहाज
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताकडे येणारं हे पहिलं जहाज आहे ज्याने मृत्यूच्या दारातून आपली वाट काढली आहे. लाइबेरियाचा ध्वज असलेल्या या जहाजाला सुरक्षा मिळवून देणं ही भारताची मोठी कूटनीतिक विजयाची पावती मानली जात आहे.
'शेनलोंग' सुरक्षित आलं असलं तरी, भारतीय नौवहन महामंडळाच्या मते, अजूनही २८ भारतीय ध्वज असलेली जहाजं युद्धक्षेत्राच्या आसपास आहेत. भारताने आतापर्यंत 'देश महिमा', 'स्वर्ण कमल' आणि 'विशवा प्रेरणा' यांसारख्या ७ जहाजांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळवलं आहे.
