असं सांगितलं जातं की मराठा साम्राज्याच्या काळात सैनिक इथे आपले घोडे बदलत असत, त्यामुळे या शहराचं नाव "बदलापूर" पडलं. त्या काळात हे ठिकाण फारसं महत्त्वाचं नव्हतं, ते सुरुवातीला फक्त लहानमोठ्या कामांसाठी ते वापरलं जात होतं.
पेशवेकाळात बदलापूरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेलं चोण हे त्या काळचं परगण्याचं मुख्य ठिकाण होतं. काही कागदपत्रांमध्ये बदलापूरचा उल्लेख "मौजे बदलापूर उर्फ चोण" असाही आहे.
advertisement
1738-39 च्या सुमारास रामचंद्र हरी पटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातही "मुक्काम बदलापूर" असा उल्लेख आढळतो.
इतिहासात चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेदरम्यान बदलापूर येथे मुक्काम केला होता. कळव्याचा पाणबुरुज जिंकताना डागलेल्या तोफांचा आवाज त्यांनी इथूनच ऐकला, असंही सांगितलं जातं. त्याचप्रमाणे वसई मोहिमेतून वाघोलीकडे जाताना सरदार पिलाजीराव जाधव यांचाही मुक्काम बदलापूर येथे होता.
दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या काळातही बदलापूर परिसरात महत्त्वाच्या लढाया झाल्या. पेशव्यांच्या सरदारांनी कॅप्टन गॉडार्ड आणि हॉर्टलेचा पराभव कुळगाव आणि बदलापूरच्या आसपास केला होता. हळूहळू पेशव्यांच्या काळात बदलापूरचं महत्त्व वाढू लागलं आणि इतिहासात त्याची नोंद पक्की झाली.
