भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांची तसंच रेल्वेची सुरक्षा हे नेहमीच मोठं आव्हान राहिलं आहे. रेल्वे व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपीचे जवान चोवीस तास काम करतात.
आरपीएफला गुप्त माहिती मिळाली होती की दक्षिण एक्सप्रेस ट्रेनमधून (ट्रेन क्रमांक 12722) एक व्यक्ती दारू घेऊन जात आहे. या व्यक्तीकडे दोन मोठ्या बॅग असल्याचं सांगण्यात आलं. गुप्त माहितीनंतर आरपीएफ टीम सतर्क झाली आणि पाळत वाढवली. 12 जुलै 2024 रोजी मध्यरात्री अडीच वाजता ट्रेन मुलताई स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर येताच आरपीएफची टीम सक्रिय झाली. ट्रेनमध्ये तपास सुरू झाला.
advertisement
शेवटच्या डब्यात संशयास्पद व्यक्ती
जेव्हा जवान ट्रेनच्या शेवटच्या बोगीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दोन मोठ्या बॅग असलेली एक व्यक्ती दिसली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती व्यक्ती दक्षिण एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्यात प्रवास करत होती. आरपीएफचे पथक त्या बोगीत पोहोचले आणि संशयास्पद व्यक्तीला बॅग उघडून दाखवण्यास सांगितलं. ती व्यक्ती आधी घाबरली होती पण नंतर जवानांच्या कडक कारवाईनंतर आरोपीने बॅग उघडली.
बॅगेतील वस्तू पाहून आरपीएफ जवानांना धक्का
दोन्ही पिशव्यांमध्ये 1 किंवा 2 डझन नाही तर विदेशी दारूच्या एकूण 225 बाटल्या होत्या. मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्या पाहून आरपीएफ जवान हादरला. यानंतर आरपीएफने दारू तस्कराला ट्रेनमधून उतरवून आपल्या ताब्यात घेतलं.
चौकशीत काय समोर आलं?
व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव समरसिंग चौहान असल्याचं सांगितलं. तो औरंगाबाद (बिहार) येथील रहिवासी आहे. दोन्ही बॅग आपल्याच असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर संबंधित व्यक्ती आणि दोन्ही बॅग आरपीएफ पोलिस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.