जगभरात आजवर फक्त 6 रुग्ण असे आढळलेत जे रेबीज झाल्यावरही जिवंत राहिले. बाकी सर्व प्रकरणांत मृत्यू निश्चित मानला जातो. हा आजार होऊ नये यासाठी लस उपलब्ध आहे. पण एकदा का त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा आजार दिसू लागला तर मात्र त्यावर उपचार शक्य नसतात.
रेबीज झाल्यावर काय घडतं?
रेबीज झालेल्या रुग्णाची अवस्था इतकी भीषण होते की त्याला साधारण रुग्णांसारखे ठेवणे कठीण जाते. अशा रुग्णाला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. सर्वात भयंकर लक्षण म्हणजे हायड्रोफोबिया. रुग्णाला तहान लागते पण पाणी पाहूनच भीती वाटते. घरच्यांना ओळखणेही कठीण जाते. तो कधी कधी रेबिड कुत्र्यासारखा तोंडातून फेस काढतो, भुंकतो. त्याला ताप येतो, आकडी येते, अस्वस्थता होते, फिट्स आणि लकवा यासारख्या समस्याही होतात.
advertisement
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 5726 लोक रेबीजमुळे मृत्युमुखी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार हा आकडा अजून मोठा आहे. भारतात दरवर्षी 18,000 ते 20,000 मृत्यू होतात, जे संपूर्ण जगभरातील रेबीज मृत्यूंपैकी 36% आहेत. विशेष म्हणजे या मृत्यूंमध्ये मुलं आणि तरुण यांची संख्या जास्त आहे.
रेबीज शरीरावर कसा परिणाम करतो?
रेबीजचा विषाणू (Virus) रेबडोव्हिरिडे (Rhabdoviridae) कुटुंबातील लाइसाव्हायरस (Lyssavirus) या प्रकारातील आहे. हा विषाणू अत्यंत धोकादायक असून तो थेट मेंदू आणि मज्जासंस्था (Central Nervous System) यांच्यावर हल्ला करतो.
ज्या ठिकाणी प्राणी चावतो, त्या भागातील रक्त पेशी किंवा मज्जासंस्था यांच्या माध्यमातून विषाणू शरीरात प्रवेश करतो.
तिथून तो हळूहळू मेंदूकडे जातो आणि मज्जातंतूंपर्यंत (Nervous system) पोहोचतो.
एकदा मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा विषाणू स्वतःभोवती एक अभेद्य कवच तयार करतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immune System), अँटीबॉडीज किंवा अँटीव्हायरल औषधे त्याला थांबवू शकत नाहीत.
हळूहळू तो मेंदूच्या पेशी नष्ट करतो आणि रोगप्रतिकारक यंत्रणेलाही दिशाभूल करतो. त्यामुळे ती रुग्णाला वाचवण्याऐवजी कधी कधी स्वतःवरच हल्ला करते.
रेबीजवर इलाज का नाही?
आजपर्यंत रेबीजसाठी कोणताही ठोस उपचार सापडलेला नाही. एकदा लक्षणे दिसू लागली की मृत्यू निश्चित असतो. जगभरात संशोधन सुरू आहे, पण विषाणूने तयार केलेले ते अभेद्य कवच भेदणे अत्यंत कठीण असल्याने औषधं निष्फळ ठरतात. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे प्रतिबंधक लस.