Raksha Bandhan 2025: जेवणापूर्वी की जेवणानंतर? घरी आलेल्या भावाला कधी राखी बांधणे योग्य ठरेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो आपल्या कुटुंब व्यवस्थेतील भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा मान राखणारा विधी आहे. हा विधी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने केल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते.
मुंबई : रक्षाबंधन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलं असल्यानं सर्वत्र रक्षाबंधनची चर्चा आहे. बाजारात राख्यांचे स्टॉल फुलले आहेत. बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदी करत आहेत. रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो आपल्या कुटुंब व्यवस्थेतील भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा मान राखणारा विधी आहे. हा विधी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने केल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते, असे मानले जाते. पूर्वापार भारतात रक्षाबंधन साजरे करण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनसाठी भाऊ बहिणीच्या घरी भेट देतात. घरी आलेल्या भावासाठी बहिण स्वयंपाक करते, जेवणाचा बेत बहिणीच्या घरी केला जातो. पण राखी केव्हा बांधावी याबाबत आज आपण जाणून घेऊ.
या वर्षी शनिवारी 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. यंदाच्या रक्षाबंधनासाठी कोणताही अशुभ काळ (भद्रा) नाही, त्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभर राखी बांधू शकता. त्यातल्या त्यात सकाळी ५:३५ ते दुपारी १:२४ पर्यंत राखी बांधणे योग्य ठरेल, या दिवसातील अतिशय शुभ वेळ म्हणजे पहाटे ४:२२ ते ५:०४ (ब्रह्म मुहूर्त)
घरी आलेल्या भावाला राखी बांधताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या. परंपरेनुसार, राखी नेहमी जेवणापूर्वी बांधणे योग्य असते. याचे कारण म्हणजे राखी हा एक पूजा विधी आहे, राखी बांधणं हा केवळ धागा बांधणे नसून, औक्षण करणे, टिळा लावणे आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे, अशा सर्व विधींचा तो भाग आहे. हिंदू धर्मात पूजा-अर्चा नेहमी जेवणापूर्वी, स्वच्छ आणि रिकाम्या पोटी केली जाते. त्यामुळे राखी बांधण्यासारखा शुभ विधी जेवणापूर्वीच करणं उत्तम ठरेल. राखी बांधल्यानंतर आणि औक्षण झाल्यावर भाऊ आणि बहिणीने एकत्र मिठाई खावी. त्यानंतर तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत एकत्रितपणे जेवण करू शकता.
advertisement
एकंदरीत जेवणापूर्वी राखी बांधणे योग्य ठरेल. भावाने घरी आल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर, राखी बांधण्याचा विधी पूर्ण करावा आणि त्यानंतरच आनंदाने जेवण करावे.
राखी बांधण्याचा विधी - राखी बांधण्याआधी भावाला स्वच्छ जागेवर पाटावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवावे. बहिणीने भावाला कुंकू ओले करून त्याचा टिळा लावून त्यावर अक्षता लावाव्यात. त्यानंतर निरांजन लावून औक्षण करावे. औक्षण झाल्यावर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना, देवांकडे माझ्या भावाचे रक्षण कर अशी प्रार्थना करू शकता. राखी बांधल्यावर बहिणीने भावाला मिठाई भरवावी आणि भावानेही बहिणीला मिठाई भरवावी. हे त्यांच्या नात्यातील गोडव्याचे प्रतीक आहे.
advertisement
शेवटी, भावाने बहिणीला भेटवस्तू किंवा पैसे द्यावेत आणि तिच्या पाठीशी नेहमी उभे राहण्याचे वचन द्यावे. अशा प्रकारे विधीपूर्वक रक्षाबंधन केल्याने हा सण अधिक अर्थपूर्ण आणि आनंदाचा होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Raksha Bandhan 2025: जेवणापूर्वी की जेवणानंतर? घरी आलेल्या भावाला कधी राखी बांधणे योग्य ठरेल