होळीचा आनंद क्षणात विरला, मामा-भाच्यावर काळाचा घाला, वाटेतच झाला मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Accident in Thane: ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदरमध्ये होळी आणि धुळवड साजरी करून घरी येताना इथं एका मामा भाच्यावर काळाने घाला घातला आहे.
राजा मयाल, प्रतिनिधी मीरा भाईंदर: ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. होळी आणि धुळवड साजरी करून घरी येताना इथं एका मामा भाच्यावर काळाने घाला घातला आहे. घरी पोहोचण्याआधीच दोघांचा वाटेत मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी होळी पेटवून आनंदी झालेल्या कुटुंबावर दोघांच्या मृतदेहाला अग्नी देण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी मामा भाच्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
प्रल्हाद माळी आणि मनोज जोगारी असं मृत पावलेल्या मामा भाच्याचं नाव आहे. शुक्रवारी दोघंही होळी-धुळवड साजरी करून घरी जात होते. दरम्यान, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भारुड गावाच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता ही दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाट वज्रेश्वरी येथील रहिवाशी असणारे प्रल्हाद माळी आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा मनोज जोगारी दोघं होळीच्या कार्यक्रमासाठी ढेकाळे मनोर येथे गेले होते. ते दोघे यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून अहमदाबाद महामार्गावरून शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास येत होते. महामार्गावर ढेकाळे येथे दुचाकी भरधाव वेगाने येत असताना लोखंडी ब्रीजजवळ दुचाकी वरील नियंत्रण गेल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून दोघे रस्त्यावर पडून जखमी झाले. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
सदर घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. मामा भाच्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने भिणार गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद मांडवी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
March 15, 2025 8:32 AM IST