एक कॉल अन् संसार उद्ध्वस्त, निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचं सगळं कुटुंबच संपलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बेळगाव जिल्ह्यातील खानापुरा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महाराष्ट्र सरकारच्या निवृत्त अधिकाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापुरा याठिकाणी एका निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून या दाम्पत्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी मयताच्या फोटो आयडीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, अशी धमकी आरोपींनी व्हिडिओ कॉलवर दिली होती. अटकेच्या भीतीने दाम्पत्याने आपलं जीवन संपवलं आहे.
डिएगो नजरत (८३) आणि पाविया नजरत (७९) असं आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. डिएगो हे महाराष्ट्रात रेल्वे विभागात अधिकारी होते. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार या वृद्ध जोडप्याला फोन करून धमकावत होते. पोलीस अधिकारी असल्याचं भासवून त्यांनी फोटो आयडीचा वापर करून काही लोकांची फसवणूक केल्याची धमकी दिली होती. धमक्यांना घाबरून या जोडप्याने विविध प्रसंगी फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तथापि, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अधिक पैसे देण्यासाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून अखेर या जोडप्याने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेडा म्हणाले की, जोडप्याच्या घरी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. "त्यांना (जोडप्यांना) त्यांच्या फोटो आयडीचा वापर करून कोणीतरी सायबर फसवणूक केल्याचा फोन आला. त्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी तो कॉल दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला. त्यांच्यात काय संभाषण झाले हे माहीत नाही. त्यांनी या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल तर पैसे द्या, अशी मागणी केली. या जोडप्याने सायबर फसवणूक करणाऱ्यांना पाच लाख दिले होते. पण त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही. अन्य एका व्यक्तीने सेम पॅटर्नने दाम्पत्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. त्यानंतर, जोडप्याने ज्या व्यक्तीला आधी पैसे दिले होते त्याला फोन केला. परंतु समोरून कुठलाही प्रतिसाद मिळला नाही. यानंतर जोडप्याने आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला आणि काही वेळात मृत्यूला कवठाळलं.
advertisement
एसपी म्हणाले की, नजरत हे महाराष्ट्रात रेल्वेमध्ये काम करत होते. ते २२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते आपल्या पत्नीसह बीडी गावात स्थायिक झाले. या जोडप्याला मुले नव्हती. या प्रकरणी सायबर गुन्हे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Belgaum,Belgaum,Karnataka
First Published :
March 29, 2025 9:15 AM IST