प्लॉटची डिल केली अन्...बागूल टोळीचा मोठा कारनामा! आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Crime : जमीन व्यवहारात जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेऊन तब्बल ५७ लाख रुपये वसूल केल्याचा आणि जागेचा ताबा सोडण्यासाठी २ कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक : विसे मळा गोळीबार प्रकरणानंतर नाशिकरोड कारागृहात असलेल्या बागुल टोळीवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. जमीन व्यवहारात जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेऊन तब्बल ५७ लाख रुपये वसूल केल्याचा आणि जागेचा ताबा सोडण्यासाठी २ कोटींची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संजय राठी, महेश राठी, अजय बागुल, मामा राजवाडे आणि बाळासाहेब ऊर्फ भगवंत पाठक यांच्यासह २० जणांविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रथमच बाळासाहेब पाठकचे नाव समोर आल्याने बागुल टोळीच्या कारवायांचे जाळे आणखी मोठे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूर्तिकार चंदन गोटीराम भोईर (वय ४०, रा. सरस्वतीनगर, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जबरदस्तीने प्लॉटचा कब्जा
तक्रारीनुसार, आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांसह भोईर यांच्या घराच्या परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी प्लॉटवरील तारकंपाउंड, पत्र्याचे शेड आणि मालकी दर्शवणारा बोर्ड फोडला. यानंतर प्लॉटवर नवीन वॉल कम्पाउंड बांधण्याचा प्रयत्न करत भोईर कुटुंबाला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या दरम्यान संजय राठी आणि प्रतिक लोळगे यांनी लोखंडी रॉडने चंदन भोईर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार चुकला आणि कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचला.
advertisement
५७ लाखांची खंडणी आणि २ कोटींची मागणी
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून ५७ लाख रुपये खंडणी म्हणून घेतल्याचा आरोप आहे. हे पैसे दिल्यानंतरही त्रास थांबला नाही. बागुल टोळीने पुन्हा धमक्या देत जागेचा ताबा सोडण्यासाठी २ कोटींची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास भोईर कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. फिर्यादीकडून जबरदस्तीने सुलेनामा करून घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
advertisement
धार्मिक मूर्तिकार परिवाराला गुंडांचा त्रास
भोईर कुटुंब हे नाशिकमधील प्रख्यात मूर्तिकार असून भगवान शंकर आणि कालिमाता यांच्या मूर्ती तयार करतात. शहरातील अनेक नागरिक त्यांच्याकडे धार्मिक अडचणी सोडवण्यासाठी जातात. या परिवाराच्या जमिनीवर राठी गटाने नजर ठेवून त्यांना वेठीस धरल्याचा आरोप आहे. मार्च ते ऑगस्ट २०२५ दरम्यान हे कुटुंब सतत दहशतीखाली होते. त्यांनी ५७ लाख रुपये देऊन सुटका मिळवली असली तरी २ कोटींची मागणी झाल्याने शेवटी ते पोलिसांकडे गेले. सुरुवातीला हे प्रकरण "दिवाणी वाद" असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले होते.
advertisement
मात्र, गोळीबार आणि पंजाब बार प्रकरणांनंतर पोलिसांनी बागुल टोळीवर कारवाई सुरू केल्यानंतर भोईर कुटुंबाने पुन्हा धैर्य एकवटून तक्रार दिली. या तक्रारीनंतर बागूल टोळीचा पाय आणखी खोलात गेला आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्लॉटची डिल केली अन्...बागूल टोळीचा मोठा कारनामा! आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?











