Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Dhurandhar SSP Chaudhry Aslam: संजय दत्तच्या ‘धुरंधर’मधील गाजलेला एंट्री सीन कराचीतील कुख्यात पोलीस अधिकारी चौधरी असलम यांच्या वास्तव आयुष्याशी जोडला जात आहे. एन्काउंटर, गँगवॉर आणि तालिबानविरोधी कारवायांनी भरलेली त्यांची स्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई: धुरंधर मध्ये संजय दत्त यांचा एंट्री सीन एका हातात सिगारेट, दुसऱ्या हातात पिस्तूल आणि पार्श्वभूमीवर वाजणारे ‘हवा-हवा’ गाणे; हा केवळ सिनेमातील मसालादार प्रसंग नाही. तो कराचीतील सर्वात कुख्यात आणि चर्चेत राहिलेल्या पोलीस अधिकारी SSP चौधरी असलम यांच्या खऱ्या आयुष्याचे चित्रण असल्याचे मानले जात आहे.
advertisement
पाकिस्तानमधील हा ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ स्वतःला कधीच फिल्मी हिरो मानत नव्हता, मात्र तो अनेकदा म्हणत असे, “एक दिवस माझ्यावरही चित्रपट बनेल.” ‘धुरंधर’ने जणू त्याची हीच भविष्यवाणी खरी ठरवली आहे. मात्र या चित्रपटाबाबत त्यांच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे. चौधरी असलम यांची संपूर्ण स्टोरी जाणून घ्या.
advertisement

चौधरी असलम यांचे खरे नाव मोहम्मद असलम खान होते. त्यांचा जन्म 1963 साली खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मनसेहरा येथे झाला. 1980 च्या दशकात त्यांनी सिंध पोलीस दलात नोकरीला सुरुवात केली. गुलबहार पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास लवकरच कराचीतील अंडरवर्ल्डविरोधातील लढ्याचा केंद्रबिंदू बनला. स्टार्च लावलेली पांढरी शलवार-कमीज, कडक आणि थेट बोलण्याची शैली आणि बिनधास्त वावर हीच त्यांची ओळख होती. गुन्हेगारांसाठी ते भीतीचे नाव बनले, तर व्यवस्थेसाठी ते एक प्रभावी हत्यार ठरले.
advertisement

कराचीच्या लयारी परिसरावर एकेकाळी गँगस्टर रहमान डकैतचे वर्चस्व होते. हाच रहमान डकैत कधी बेनझीर भुट्टो यांची बुलेटप्रूफ कार चालवत होता आणि त्याच वेळी पोलिसांच्या वाँटेड यादीतही त्याचे नाव होते. 2006 साली चौधरी असलम यांनी रहमान डकैतला बलुचिस्तानमधून अटक केली आणि ही कारवाई ऐतिहासिक मानली गेली. मात्र व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे हा विजय लवकरच लाजिरवाणा ठरला. सुमारे 5 कोटी रुपयांची लाच देऊन रहमान डकैत पोलीस कोठडीतून ‘पाहुण्यासारखा’ बाहेर पडला. याच घटनेनंतर रहमानला पकडणे हे चौधरी असलम यांच्यासाठी केवळ कर्तव्य न राहता स्वाभिमानाची लढाई बनली. अखेर 2009 साली बिन कासिम भागात झालेल्या एन्काउंटरमध्ये रहमान डकैत ठार झाला. पोलिसांनी या घटनेला चकमक म्हटले, तर टीकाकारांनी त्याला सूड मानले. मात्र यानंतर लयारीतील गँगवॉरची ताकद मोडली, हे वास्तव नाकारता येत नाही.
advertisement

27 एप्रिल 2012 रोजी लयारीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाई सुरू करण्यात आली. तब्बल 3,000 पोलीस, बख्तरबंद वाहने, स्नायपर्स आणि APC तैनात करण्यात आले. मात्र गँगस्टर्सनी RPG रॉकेट्सने प्रत्युत्तर दिले. आठ दिवस लयारी पूर्णपणे सील करण्यात आले. वीज आणि पाणीपुरवठा बंद झाला, लोक उपाशी आणि तहानले राहिले. याच काळात चौधरी असलम यांचा एक वादग्रस्त चेहरा समोर आला, जेव्हा त्यांनी राशन घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्समधील गोण्या चाकूने कापल्या. समर्थकांच्या मते ते कठोर पण आवश्यक निर्णय होते, तर टीकाकारांच्या मते हा अमानुषपणा होता.
advertisement

‘धुरंधर’ रिलीज झाल्यानंतर लयारीतील अनेक लोकांनी सांगितले की चित्रपटात असलम यांना जितके ताकदवान दाखवले आहे, प्रत्यक्षात ते तसे नव्हते. जर ते इतके शक्तिशाली असते, तर लयारी आठ दिवस वेढ्यात असतानाही ते आत का गेले नाहीत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मात्र अनेकांनी हा निर्णय शहाणपणाचा असल्याचे मानले.
advertisement
2009 नंतर पाकिस्तानने तालिबानी दहशतवाद्यांवर हवाई हल्ले सुरू केले. त्यानंतर अनेक दहशतवादी सीमावर्ती भागातून पळून कराचीमध्ये येऊन लपले. मोठी लोकसंख्या आणि गजबजलेले शहर असल्यामुळे कराची त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरले. सुरुवातीला त्यांनी गुन्हेगारांप्रमाणे बँक लुटी आणि खंडणी सुरू केली, पण लवकरच त्यांनी थेट दहशतवादी हल्ल्यांकडे मोर्चा वळवला. 8 जून 2014 रोजी जिन्ना इंटरनॅशनल विमानतळावर रॉकेट लॉन्चर आणि ग्रेनेड हल्ला झाला. हल्लेखोर सुरक्षादलाचे सदस्य असल्यासारखे दिसत होते. हा हल्ला थेट पाकिस्तानच्या लष्कराला दिलेले आव्हान मानले गेले. प्रत्युत्तरात 10 दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यानंतर लयारीतील गँगस्टर्सचा पूर्ण सफाया करण्याची तयारी सुरू झाली. मात्र त्याआधीच चौधरी असलम यांचा मृत्यू झाला.

तालिबानने 2011 साली चौधरी असलम यांच्या घरावर कार बॉम्ब हल्ला केला. त्या हल्ल्यातून ते जिवंत बाहेर आले आणि त्यावेळी त्यांनी म्हटलेले वाक्य त्यांना ‘सुपरकॉप’ बनवणारे ठरले, “मी शहीदांना दफन करत नाही, मी हल्लेखोरांना दफन करतो.”
त्यांच्यावर एकूण नऊ वेळा प्राणघातक हल्ले झाले. एकदा तर त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले, तरीही प्रत्येक वेळी ते बचावले. मात्र जानेवारी 2014 मध्ये 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार त्यांच्या ताफ्यावर आदळली आणि यावेळी मृत्यू टळला नाही. कराचीचा सर्वात भीतीदायक चेहरा धूर आणि आगीत कायमचा हरवला.

चौधरी असलम यांच्या पत्नी नूरीन असलम यांच्याबाबत सुरुवातीला माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की, त्यांना चित्रपट आवडला आहे. मात्र आता त्यांनी चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नूरीन असलम यांनी हा चित्रपट पाकिस्तानविरोधी कट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, चित्रपटात दाखवलेली गँगस्टरची प्रतिमा पाकिस्तानची बदनामी करणारी आहे. तसेच चित्रपटात त्यांच्या पतीच्या व्यक्तिरेखेला गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जोडले गेले असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ट्रेलरमधील एका डायलॉगवर त्यांनी आक्षेप घेतला असून, त्या डायलॉगमध्ये म्हटले आहे की, “शैतान आणि जिन्नांपासून जन्मलेले मूल म्हणजे चौधरी असलम.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 15, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो







