करिअर सेट असतानाही आमीर खानच्या भावाने का सोडलं बॉलिवूड? लग्जरी लाइफ सोडून करतोय शेती
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एके काळी आमीरसोबत सुपरहिट चित्रपट दिलेला आमीरचा एक भाऊ मात्र आता शेती करतो. तमिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये ते सेंद्रिय शेती करतात.
लोकप्रिय अभिनेता आमीर खानचं संपूर्ण कुटुंबंच चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. आमीरचे काका, वडील, भाऊ यांचं चित्रपटसृष्टीत योगदान आहे. एके काळी आमीरसोबत सुपरहिट चित्रपट दिलेला आमीरचा एक भाऊ मात्र आता शेती करतो. तमिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये ते सेंद्रिय शेती करतात.
चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक नासिर हुसैन यांचे पुत्र मन्सूर खान हेही चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांनी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाद्वारे त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘जोश’ हे त्यांचे चित्रपट यशस्वी ठरले. काही कालावधीचा ब्रेक घेऊन २००८ मध्ये बहिणीचा मुलगा इम्रान खान याच्यासाठी ते पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परतले. ‘जाने तू... या जाने ना’ या चित्रपटाद्वारे त्यांनी इम्रान खानला लाँच केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला. विशेष म्हणजे मुंबईतल्या मायानगरीपासून दूर जाऊन त्यांनी तमिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये बस्तान बसवलं आहे.
advertisement
चित्रपट क्षेत्रातली इतकी यशस्वी कारकीर्द असतानाही त्यांनी वेगळ्या वाटेनं जाणं पसंत केलं. पत्नी आणि दोन मुलांसह ते कुन्नूर इथं जाऊन राहिले. तिथे ते शेती करतात. त्यांची मुलगी झायन मेरी खान अभिनेत्री आहे, तर मुलगा पाब्लो इवान खान दिग्दर्शक आहे. मन्सूर खान निर्मिती संस्थेअंतर्गत तो चित्रपटांचं दिग्दर्शन करतो.
advertisement
मन्सूर खान सेंद्रिय शेती करतात. तसंच त्यांची पनीरची फॅक्टरीदेखील आहे. एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटांबाबत बोलणं आवडत नसल्याचं सांगितलं होतं. त्यांना चित्रपटांमध्ये फारसा रस नाही, त्यामुळे हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी फारसं अवघड नव्हतं, असं ते म्हणाले. पण पत्नीचं करिअर त्या वेळी नुकतंच सुरू होत होतं. त्यामुळे पत्नीसाठी ते आव्हानात्मक होतं. पत्नीचा आनंद सर्वांत जास्त महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. कुन्नूरमध्ये पत्नी खूश नसती तर आपणही खूश राहिलो नसतो असं ते म्हणाले. त्यांना लेखनावर लक्ष केंद्रित करायचं आहे, त्यामुळे चित्रपटांबाबत बोलण्यात रस नाही असं ते म्हणतात. निसर्गाचा नाश होतो आहे. त्यामुळे चित्रपटांवर बोलणं हे वेळ वाया घालवण्यासारखं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कदाचित म्हणूनच मन्सूर खान यांनी चित्रपट क्षेत्र सोडून सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला आहे. संपूर्ण कुटुंब चित्रपट क्षेत्रात कार्यरत असताना असं वेगळं काही करणं अतिशय कौतुकास्पद म्हणावं लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2024 6:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
करिअर सेट असतानाही आमीर खानच्या भावाने का सोडलं बॉलिवूड? लग्जरी लाइफ सोडून करतोय शेती