India Partition 1947: फाळणीवेळी या मुद्द्यावरून भारत आणि पाकमध्ये जुंपली! शेवटी टॉस करुन घेतला निर्णय
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
India Partition 1947: फाळणीच्या वेळी व्हाईसरॉयच्या गाड्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. शेवटी टॉस करुन निर्णय घेण्यात आला.
मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी झाली. पाकिस्तान म्हणून स्वतंत्रपणे उदयाला आलेला तो देश भारतातूनच विभागून तयार होणार होता. त्यामुळे फाळणीवेळी भारतात राहील किंवा पाकिस्तानात जाईल अशा चल-अचल संपत्तीबाबत बराच खल आधी झाला होता. या सगळ्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये सर्वांत जास्त वाद झाले ते व्हाइसरॉयच्या बग्गीवरून. इतिहासकार डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या पुस्तकात त्याबाबत लिहिलं आहे.
स्वातंत्र्याआधी भारतातल्या व्हाइसरॉयकडे 12 बग्गी म्हणजे घोडागाडी होत्या. त्या बग्गींवर सोन्याची किंवा चांदीची हातानं केलेली कलाकुसर होती. तसंच विविध सजावटींनी त्या बग्गी आकर्षक बनवल्या होत्या. त्यावर लाल मखमली गाद्या होत्या. या बग्गींमधून साम्राज्यवादी सत्तेची शान दिसत होती.
भारतातले प्रत्येक व्हाइसरॉय आणि शाही पाहुण्यांना याच घोडागाड्यांमधून राजधानीतल्या रस्त्यांवर फिरवलं जायचं. ब्रिटिश सत्ताधीशांनी खास औपचारिक प्रसंगांवेळी व्हाइसरॉयला त्यातून फेरी मारून आणण्यासाठी त्या बग्गी तयार करून घेतल्या होत्या. देशाची फाळणी होताना याच बग्गींवरून भारत आणि पाकिस्तानात जुंपली होती. इतिहासकार डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या पुस्तकात त्याबाबत लिहिलं आहे.
advertisement
या बग्गींपैकी सहा बग्गी सोन्याच्या, तर सहा चांदीच्या होत्या. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये त्यांची वाटणी कशी करायची याबाबत विचार सुरू होता. त्या बग्गींचे सेट तोडणं योग्य नव्हतं. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यापैकी एकाला सोन्याच्या व दुसऱ्याला चांदीच्या बग्गी द्यायच्या असं आधी ठरलं होतं, पण सोन्याच्या कोणाला व चांदीच्या कोणाला द्यायच्या हे ठरत नव्हतं. दोन्ही देशांना स्वतःकडे सोन्याच्या बग्गी हव्या होत्या.
advertisement
या मुद्द्यावर बरेच दिवस चर्चा झाल्या, तरीही निर्णय होऊ शकला नाही. तेव्हा व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांचे ए. डी. सी. लेफ्टनंट कमांडर पीटर होज यांनी सल्ला दिला, की या वादावर नाणं उडवून निर्णय घेण्यात यावा. त्या वेळी तिथे पाकिस्तान बॉडीगार्डचे नुकतेच नियुक्त झालेले कमांडर मेजर याकूब खान आणि व्हाइसरॉय बॉडीगार्डचे कमांडर मेजर गोविंद सिंह उपस्थित होते. तिथे लेफ्टनंट कमांडर पीटर होज यांचा सल्ला मान्य करण्यात आला.
advertisement
भारताला मिळाल्या सोन्याच्या बग्गी
पीटर होज यांनी लगेचच खिशातून चांदीचं एक नाणं काढलं व ते हवेत उडवलं. नाणं जमिनीवर पडलं. काय निकाल लागला या उत्सुकतेनं तीन जण खाली झुकले. तेवढ्यात मेजर गोविंद सिंह यांच्या तोंडून आनंदोद्गार बाहेर पडले. नशीबानं ते दान भारताच्या पारड्यात घातलं होतं. सोन्याच्या बग्गी भारताला मिळतील व स्वतंत्र भारताच्या रस्त्यांवर फिरतील हे नियतीच्या मनात होतं. त्या निकालानं चांदीच्या बग्गी पाकिस्तानला मिळाल्या. त्यानंतर घोड्यांचं सामान, चाबूक, कोचवानांचे बूट आणि वर्दी अशा गोष्टींचीही वाटणी झाली.
advertisement
अखेर एडीसींनीच नेलं बिगुल
सामानाची वाटणी करताना सगळ्यात शेवटी एक बिगुल शिल्लक राहिलं. घोड्यांना रस्त्यावर नीट चालवण्यासाठी कोचवान त्याचा वापर करायचे. विशेष म्हणजे व्हाइसरॉयच्या 12 घोडागाड्यांसाठी एकच बिगुल होता. त्यामुळे पीटर होज पुन्हा विचारात पडले. बिगुलचे दोन तुकडे करण्यात काही अर्थ नव्हता, कारण नाही तर त्याचा काहीच उपयोग झाला नसता. मग त्याचाही निर्णय नाणेफेक करूनच घ्यावा असा विचार एकदा त्यांच्या डोक्यात आला. मग ते मेजर याकूब खान व मेजर गोविंद सिंह यांना म्हणाले, 'जर बिगुलचे दोन तुकडे केले तर ते पुन्हा कधीच वाजू शकणार नाही. त्यामुळे त्याची वाटणी करणं तर शक्य नाही. अशा परिस्थितीत माझ्याकडे एकच समाधानकारक तोडगा आहे, तो म्हणजे हे बिगुल मी माझ्याकडेच ठेवावं...' होज यांनी हसतच ते बिगुल काखेत धरलं व तिथून बाहेर पडले.
advertisement
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना देशाची फाळणी ही न विसरता येणारी गोष्ट आहे. दोन्ही देशांच्या विभाजनादरम्यान संपत्तीच्या वाटण्या करताना व्हॉइसरॉय यांच्या बग्गींची वाटणी कशी झाली ते इतिहासकारांनी नोंदवून ठेवलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2024 11:35 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
India Partition 1947: फाळणीवेळी या मुद्द्यावरून भारत आणि पाकमध्ये जुंपली! शेवटी टॉस करुन घेतला निर्णय