Dombivli: निवडणूक संपली, पाणी संपलं! डोंबिवलीमध्ये भीषण पाणीटंचाई, लोकांना विकत घ्यावं लागतं पाणी!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
डोंबिवलीतल्या आयरे गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे जगणे कठीण झाले आहे.
डोंबिवली: डोंबिवलीतल्या आयरे गावातील नागरिकांना सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यामुळे आयरे गावातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. परिसरातल्या नागरिकांना महानगरपालिकेकडून अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना आता दैनंदिन वापरासाठी पाणी खरेदी करून घ्यावे लागत आहे. नागरिकांना पाणी खरेदी करण्यासाठी तब्बल 200 रूपये मोजावे लागत आहे, त्यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित फिस्कटले आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.
डोंबिवली पूर्वेतल्या आयरे गावातील टावरी पाडा भागामधील नागरिकांना पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून नागरिकांच्या मुलभूत गरजांकडेच दुर्लक्ष होत असल्यामुळे डोंबिवलीकरांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दररोज नागरिकांना पाणी येत असल्यामुळे त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन सकाळच्या वेळी एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची घाई दिसते. सकाळी अनेक नागरिक पाण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत. डोंबिवलीकरांचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की, अनेक कुटुंबांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
advertisement
खाजगी रिक्षा किंवा सायकलच्या माध्यमातून पाणी आणण्यासाठी नागरिकांना तब्बल 200 रुपये खर्च करावे लागत आहेत. दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी पैसे खर्चावे लागत असल्यामुळे अनेक नागरिकांचे आर्थिक गणित फिस्कटले आहे. डोंबिवलीकरांकडून या पाण्याच्या समस्येवरून लोकप्रतिनिधींविरोधातला रोष वाढत आहे. कल्याण- डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून संबोधलं जातं. हे सध्या शहर स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गृहिणींचे अनेक कामं पाण्या अभावी अडकून राहतात. पाणी नसल्यामुळे घरातल्या अर्ध्या कामांचा खोळंबा होतो. पाण्यामुळे डोंबिवलीकरांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.
advertisement
अशातच उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. ऐन उन्हाळ्यातच महानगर पालिकेकडून नागरिकांना पाणी व्यवस्थित सोडले जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. दरम्यान, डोंबिवली शहराची एका आदिवासी पाड्यातल्या गाव- खेड्यांसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 10:28 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli: निवडणूक संपली, पाणी संपलं! डोंबिवलीमध्ये भीषण पाणीटंचाई, लोकांना विकत घ्यावं लागतं पाणी!






