Mental Health: पुण्यातील तरुणाईला मानसिक आजारांचा विळखा, धक्कादायक अहवालानं वाढवलं टेन्शन, काय काळजी घ्याल?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Mental Health: पुण्यातील तरुणाईत मानसिक आजारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. जेव्हा निराश वाटतं किंवा अस्वस्थता जाणवते, तेव्हा दुर्लक्ष न करता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
पुणे: पुण्याला ‘विद्येचं माहेरघर’ म्हटलं जातं. अनेक तरुण आपली स्वप्नं उराशी बाळगून या ठिकाणी येतात. मात्र, याच पुण्यात तरुणांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं एम्पॉवरच्या अहवालातून समोर आलं आहे. तरुणांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण वाढण्यामागील कारणांबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मधुर राठी यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
पुण्यातील तरुणांमध्ये मानसिक ताण अधिक
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एम्पॉवर या उपक्रमातून तरुणांना मानसिक समस्यांवर समुपदेशन आणि तणावातून बाहेर येण्यासाठी मदत केली जाते. 2022 ते 2025 या कालावधीत एम्पॉवरने देशभरातील सुमारे 5 लाख 27 हजार तरुणांना समुपदेशनाचा लाभ दिला आहे. अलीकडेच जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त या कामाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील तरुणांमध्ये मानसिक ताण अधिक असल्याचं या अहवालातून दिसून आलं आहे.
advertisement
पुण्यात 2 लाख 67 हजार तरुणांचे समुपदेशन
या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत पुण्यातील 2 लाख 67 हजार तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यात 1 लाख 13 हजार तरुण आणि 1 लाख 46 हजार तरुणींचा समावेश आहे. विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने मानसिक ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरतेच्या समस्या अधिक प्रमाणात आढळतात. एम्पॉवरच्या समुपदेशनामध्ये तणाव, नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, अस्थिरता, अतिक्रियाशीलता विकार आणि मोबाइलचा अतिवापर अशा समस्या सर्वाधिक आढळल्या आहेत.
advertisement
डॉ. मधुर राठी यांनी सांगितले की, कोविडनंतर लोकांमध्ये मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या मानसिक समस्यांवर आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. हाच बदल या अहवालातील आकडेवारीत स्पष्ट दिसतो. त्यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील तरुणवर्ग इतर शहरांच्या तुलनेत अधिक खुलेपणाने मानसिक समस्यांवर बोलतो. त्यामुळे पुण्यात मानसिक समस्यांचे प्रमाण जास्त असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
advertisement
डॉ. राठी यांच्या मते, 18 वर्षांनंतर तरुणांच्या आयुष्यात करिअर, घर, नातेसंबंध अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी येतात. त्यामुळे ताण वाढतो आणि मानसिक अडचणी निर्माण होऊ शकतात. हा ताण कमी करण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी मन मोकळं करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा निराश वाटतं किंवा अस्वस्थता जाणवते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 30, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Mental Health: पुण्यातील तरुणाईला मानसिक आजारांचा विळखा, धक्कादायक अहवालानं वाढवलं टेन्शन, काय काळजी घ्याल?

