हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्यात घरच्या घरी देखील काही योगासन करून आपण शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो.
कोल्हापूर, 16 डिसेंबर : हिवाळा सुरू झाला की अंगामध्ये एक प्रकारचा आळसपणा भरून येतो. बऱ्याचदा बाहेरच्या थंडीत पडण्यापेक्षा घरीच उबदार वातावरणात थांबलेलं बरं असं वाटत असते. मात्र घरच्या घरी देखील काही योगासन करून आपण शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. त्याचबरोबर मेंदूवर येणारा अतिरिक्त ताण देखील या उपायाने आपण कमी करू शकतो. त्यामुळेच कोल्हापूरच्या योग प्रशिक्षक हर्षदा कबाडे यांनी हिवाळ्यात मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
कोल्हापुरातील हर्षदा कबाडे या एक योगा इंस्ट्रक्टर म्हणून काम करतात. मूळच्या कर्नाटकातील गोकाक येथील असणाऱ्या हर्षदा यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करतात. पतीच्या नोकरीच्या कारणास्तव त्यांना कोल्हापूरला यावे लागले होते. सध्या आता त्या कोल्हापूरमध्ये स्थायिक असून योगाचे प्रशिक्षण देतात. खरंतर हिवाळा हा आरोग्यासाठी आरोग्यदायी ऋतू आहे. या ऋतूमध्ये निरोगी शरीर, बुद्धी आणि शांत मनासाठी योगा खूप फायदेशीर ठरतो, असे हर्षदा सांगतात.
advertisement
काय करावे हिवाळ्यात ?
हिवाळ्यात योगाच्या माध्यमातून शरीर आणि मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी प्राणायाम हा एक सोपा उपाय आहे. प्राणायामातील प्रकारांचा सराव करून मन आणि मेंदूवर येणारा ताण आपण कमी करु शकतो, रक्तदाब नियंत्रित करु शकते. नियमित प्राणायाम केल्यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते. तसेच मानसिक रोगांपासूनही संरक्षण मिळते. प्राणायाम हे शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढवण्याचे काम करते, असे हर्षदा सांगतात. यामध्ये 3 प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो.
advertisement
ॐ कार ध्यान : ॐकार ध्यान जेव्हा आपण करतो, तेव्हा मखार लंबविल्याने उच्छवासाचा कालावधी वाढतो. ॐकार म्हणताना आपले मन शांत होते, शरीराची कार्यक्षमता वाढते, आवाजामध्ये लयबद्धता यायला लागते. थंडीच्या दिवसात अंगात आलेला आळसपणा घालवण्यासाठी ॐकार उपयोगी ठरतो. योगशास्त्रात ॐकार ध्यानाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे ॐकार ध्यान करूनच योगाला सुरुवात करावी.
advertisement
सकाळी घरातून नाश्ता न करता बाहेर पडतायत? आधी 'ही' सवय मोडा; नाहीतर होवू शकतात विपरीत परिणाम Video
सूर्यभेदी/सूर्यनाडी प्राणायाम : उजव्या नाकपुडीला सूर्यनाडी असे म्हटले जाते. हे प्राणायाम करताना डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतूनच श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीतूनच श्वास सोडायचा असतो. याचे 10 ते 15 आवर्तन किंवा घड्याळात वेळ पाहत 3 मिनिट हे प्राणायाम करता येते. उष्णता वाढवणारे असल्याने हे प्राणायाम उन्हाळ्यात वर्ज्य केले असून हिवाळ्यात याचा नक्कीच फायदा होतो.
advertisement
कपालभाती : कपालभातीला शुद्धिक्रिया असे म्हटले जाते. हे फक्त शरीरातील उष्णता वाढवणारे प्राणायाम नसून पूर्णपणे शरीराची कार्यक्षमता वाढवणारे प्राणायाम आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी देखील हे प्राणायाम उपयोगी ठरते. जेव्हा आपण कपालभाती करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे शरीरात उत्साह वाढतो. हे प्राणायाम नियमित 5 मिनिट करता येते. मात्र हृदयविकार किंवा हायपरटेन्शन असणाऱ्या व्यक्तींनी कपालभाती करताना वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.
advertisement
त्याचबरोबर जर आसनांचा विचार केला तर थंडीच्या दिवसात दररोज किमान फक्त 12 सूर्यनमस्कार घालावेत. ज्यांना जमत नाहीत त्यांनी सुरवातीला 5 सूर्यनमस्कार घालत सुरुवात करावी. सूर्यनमस्कार म्हणजे 12 वेगवेगळ्या आसनांची साखळी आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरातील अवयवांना ऊर्जा मिळते अशी माहिती हर्षदा यांनी दिली आहे.
शरीराला प्रोटीनसाठी काय खावं? कोणत्या पदार्थांनी होईल फायदा पाहा PHOTOS
दरम्यान अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण दिवसातला काही वेळ देऊन आपल्या शरीराला ताजेतवाने करू शकतो. या टीप्स वापरून शरीराबरोबरच मन देखील आपण प्रफुल्लित करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने यंदाच्या हिवाळ्यात स्वतःसाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 16, 2023 6:23 PM IST