ऋषीपंचमीला असते ‘या’ भाजीचे महत्त्व, पाहा तयार करण्याची योग्य पद्धत
- Published by:News18 Marathi
- Written by:News18 Marathi
Last Updated:
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषीपंचमीला खास भाजी केली जाते. ही भाज तयार करण्याची पद्धत माहिती आहे?
डोंबिवली, 11 सप्टेंबर : आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला तितकेच महत्त्व आहे. पूर्वजांचा आदर सन्मान करण्यासाठी आणि ऋषींच्या ज्ञानाचा विसर पडू नये यासाठी गणेश चतुर्थी नंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते. या दिवशी ऋषीची भाजी केली जाते. पण ही ऋषीची भाजी म्हणजे काय, ती का करतात आणि कशी करतात यासंदर्भातील माहिती डोंबिवलीच्या सुचीता माने यांनी दिली आहे.
काय आहे उद्देश?
ऋषीमुनी म्हणजे आपले पूर्वज अशी मान्यता आहे. या ऋषींची आठवण व्हावी. त्यांच्याकडे असलेल्या प्रगल्भ ज्ञानाचा विसर पडू नये. ऋषींप्रमाणे सुदृढ आणि निरोगी आयुष्य राहावे यासाठी ही ऋषी पंचमी साजरी केली जाते. यावेळी नदीतून किंवा समुद्रातून सात खडे आणले जातात. ते खडे पाटावर ठेवले जातात. आघाडाच्या पानांची 21 देठ त्या सात खड्यांवर ठेवली जातात. त्यांची पूजा केली जाते.त्यानंतर केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो.
advertisement
वर्षातून एकदा तरी बैलाला आराम मिळावा यासाठी स्वयंपाक करताना स्वतः कष्टाने पिकवलेल्या भाज्यांची भाजी करण्याची प्रथा आहे. पूर्वी ऋषी कंदमूळ खाऊन जगत होते. त्याचबरोबर ते स्वतः हाताने पिकवून भाज्या खात असत. त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी होते असे सांगितले जाते. त्यामुळे बैलाने केलेल्या नांगरणीतून तयार झालेले अन्न यादिवशी खात नाहीत अशी माहिती माने यांनी दिली.
advertisement
कशी करतात भाजी?
वाल पापडी म्हणजेच श्रावण घेवडा, लाल भोपळा, देठा सकट भाजीचा अळू, बटाटा, रताळे, अर्वी, देठा सकट लाल माठ, पडवळ, दोडका, शेवग्याची शेंग, खोबरं, फरसबी, शेंगदाणे, हिरवी मिरची, मका, भेंडी, काकडी, गाजर, काटेकंद, मटार, पालक, चिंचेचा कोळ या भाज्या एकत्र करून ही ऋषीची भाजी करतात.
advertisement
या सर्व भाज्या धुवून चिरून घ्यावा लागतात. कढईत थोडस तेल घालावे. त्यानंतर हिरवी मिरची घालून अळूची पाने आणि लाल माठ टाकावा. या भाज्या थोड्या शिजल्या की हळू हळू कढईत टाकाव्या. त्यानंतर त्या भाज्या शिजण्यासाठी साधारण दोन पेले पाणी घालून (भाज्यांच्या प्रमाणानुसार) व्यवस्थित शिजू द्यावे. कुकरमध्येही शिजवू शकता. एक शिटी घेतली की भाज्या व्यवस्थित शिजतात. त्यानंतर त्यामध्ये कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ आणि मीठ घालुन भाजी थोडी शिजवावी. यामध्ये पाण्याच्या ऐवजी तुम्ही नारळाचे दूध देखील घालू शकता. ही भाजी करताना जिरं किंवा मोहरीची फोडणी देत नाहीत, अशी माहिती सुचिता माने यांनी दिली.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
September 11, 2023 9:36 AM IST