हरिहर गडावर ट्रेकला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत, खोल दरीत आढळला मृतदेह
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्यात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणाचा हरिहर गडावरून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणाचा हरिहर गडावरून पाय घसरून खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आशिष टीकाराम समरीत असं मृत पावलेल्या २९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील खमारी येथील रहिवासी होता. तो नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध हरिहरेश्वर किल्यावर ट्रेकींगसाठी आला होता. पण ट्रेक करताना अनर्थ घडून त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आपल्या काही मित्रांसोबत पर्यटनासाठी नाशिकमध्ये आला होता. त्यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) कळसुबाई शिखरावर यशस्वीपणे चढाई केली. त्यानंतर, शनिवारी (३० ऑगस्ट) त्यांनी हरिहर गडावर ट्रेकिंग करण्याचे ठरवले. गडावरून खाली उतरत असताना, दुपारच्या सुमारास आशिषचा तोल गेला आणि तो सुमारे १०० फूट खाली दरीत कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खरंतर, हरिहर गड हा त्याच्या खडतर चढाईसाठी ओळखला जातो. गडावर कोरलेल्या पायऱ्या ६० ते ९० अंशांच्या कोनात आहेत. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या पायऱ्यांवर शेवाळ जमा होते, ज्यामुळे त्या आणखी निसरड्या बनतात. तसेच, अनेक ठिकाणी संरक्षक कठडेही नाहीत. यामुळे येथे ट्रेकिंग करणे अतिशय धोकादायक मानले जाते.
ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. या दुर्दैवी घटनेमुळे ट्रेकिंग करणाऱ्यांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 31, 2025 11:50 AM IST


