पावसानं दडी मारल्यानं पिकांनी टाकल्या माना, हतबल बळीराजची कळकळीची मागणी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाड्यात आसमानी संकटाची चाहूल लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सरकारकडे कळकळीची मागणी होतेय.
बीड, 30 ऑगस्ट: ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट दिसत आहे. तर मोठा खर्च करून केलेली पेरणी मातीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. आसमानी संकटाची चाहुल लागल्याने बीडमधील शेतकरी हतबल दिसत असून त्यांचे डोळे आभाळाकडं लागले आहेत. तर विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सतावू लागला आहे.
पावसाने वाढवली चिंता
मराठवाड्यासह बीडला सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतं. यंदा सुरुवातीला मान्सूनने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी उरकली. मात्र, त्यानंतर पावसाने मारलेली दडी पावसाळा संपत आला तरी कायम आहे. त्यामुळे जमिनीतून उगवून वर आलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. तर शेतीतून हजार पाचशे मिळण्याची आशा लागून बसलेला शेतकरी नव्या संकटाच्या चाहुलीमुळे पुरता हैराण झाला आहे. विदारक परिस्थिती पाहून सरकारने पीक विमा मंजूर करावा, अशी मागमी होत आहे.
advertisement
जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न
पावसाचे विदारक परिस्थितीमुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. तब्बल एक महिना उलटला आहे तरी पावसाने हाजरी लावली नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे जनावरांच्या चाऱ्यासाठी ऑगस्ट महिन्यातच वन वन भटकावे लागत आहे. तर हिरवा चारा मिळत नसल्यामुळे दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपुरक व्यवसायांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे.
advertisement
जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?
बीड जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सन 2022 मध्ये जून ते 30 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 112 टक्के इतका प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र जून ते 30 ऑगस्टपर्यंत 70 टक्के इतकाच पाऊस झालाय. म्हणजेच यंदा सरासरी पेक्षा 42 टक्के पाऊस कमी झालाय. त्यामुळे पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
सोयाबीन उपटून टाकण्याची वेळ
मी माझ्या एक एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. यासाठी मला साधारणतः आठ ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च आला. मागील काही महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिली. परिणामी जवळपास अर्धा एकर क्षेत्रावरचे सोयाबीन जळून गेले आहे. आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहतोय. मात्र पाऊस अद्यापही हजेरी लावत नाहीये. त्यामुळे आता सोयाबीन हे पीक उपटून टाकण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे शेतकरी शाहू हिंगोले सांगतात.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
August 30, 2023 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
पावसानं दडी मारल्यानं पिकांनी टाकल्या माना, हतबल बळीराजची कळकळीची मागणी