Video: लगेच करा हे उपाय अन्यथा एक माशी करेल आख्खी फळबाग उद्ध्वस्त
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विविध फळ पिकांना फळमाशीचा धोका वाढला. शेतकऱ्यांनी कशी घ्यावी काळजी? इथं पाहा.
बीड, 28 ऑगस्ट: शेतकऱ्यांना नेहमीच आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच बीडमधील शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय. दरवर्षी फळबागांना फळमाशीचा फटका बसतो. मात्र, यंदा पाऊस कमी असल्याने फळमाशीचा धोका अधिक वाढला आहे. फळबागांचं मोठं नुकसान होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी माहिती दिलीय.
फळमाशीचा शेतीला धोका
दरवर्षी 15 जुलैपासून 15 सप्टेंबर पर्यंत फळमाशी संपूर्ण क्षेत्रामध्ये कार्यरत असते. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात फळ शेतीवर जाणवतोय. ही फळमाशी सर्वच पिकांवर हल्ला करते. प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, कारली, भोपळा, काकडी या फळभाज्यांसोबतच आंबा, पेरू, सीताफळ आदी फळांनाही या माशीचा धोका असतो. तसेच वेलवर्गीय फळ पिके जसे कलिंगड, खरबूज आदींवरही फळमाशीचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो, असे चांडक सांगतात.
advertisement
फळमाशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे
फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांचे निकसान होते. फळमाशीमुळे फळे वाकडी होतात. अकाली पक्वता येते. फळात अळ्या पडणे किंवा बुरशी लागण्याचे प्रकार घडतात. तसेच फळांवर डाग दिसतात. फळगळही होते. त्यामुळे फळबागेवरील माशीचं संकट टाळण्यासाठी वेळी उपाय करण्याची गरज असल्याचे चांडक सांगतात.
advertisement
फळमाशीवर उपाय
फळमाशी पासून बागेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी फळामध्ये अंडी घालण्यापूर्वी तिचा नाश करावा. त्यासाठी एकरी पाच ते सहा कामगंध सापळ्याचा वापर करावा. यामुळे नर आकर्षीत होऊन ते सापळ्यात मरून पडतात. त्यामुळे मादी व नराचे मिलन होत नाही. परिणामी माशीच्या उत्पत्तीला अटकाव होतो. तसेच बागेतील खराब फळे गोळा करून ती खोल खड्ड्यात गाडून टाकावीत, असे कृषी तज्ज्ञ सांगतात.
advertisement
शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी
उन्हाळ्यात जमीन चांगली खोलवर नांगरून उन्हात तळू द्यावी. 10 मिली मेटॉसीड, 700 ग्रॅम गुळ आणि तीन थेंब सीट्रॉनील ऑईल एकत्र करून घ्यावे. एका प्लॉस्टिकच्या डब्यात त्याचे चार थेंब टाकून त्या डब्याला दोन मिमीचे छिद्र पाडावे. यामध्ये किडीचे नर आकर्षित होऊन ते मरतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाण्यात विरघळणारे कार्बारील 50 टक्के 40 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी, असेही कृषी तज्ज्ञ चांडक सांगतात.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
August 28, 2023 3:45 PM IST