महाराष्ट्रात 'लाडक्या बहिणी'चा गवगवा मात्र झारखंडमध्ये 'लाडक्या बहिणीला' मोदींचा विरोध, वडेट्टीवारांचा हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला झारखंडमध्ये नावे ठेवणारे मोदी महाराष्ट्रात मात्र त्याच योजनेचा गवगवा करतात, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे आणि झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भाजप दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपुरात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेते उपस्थित होते.
सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला
महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
advertisement
आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
झारखंडमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेवर मोदींची टीका पण महाराष्ट्रात योजनेचा गवगवा
झारखंडमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. त्याचवेळी महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेचा मात्र मोठ्या प्रमाणावर गाजावाजा सुरू आहे. भाजपचे हे दुतोंडी धोरण नाही काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.
advertisement
भाजपकडून शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
advertisement
भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा, विधानसभेत महायुती सरकार जाणार
भाजपने सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे. असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर नक्की येईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
September 23, 2024 6:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
महाराष्ट्रात 'लाडक्या बहिणी'चा गवगवा मात्र झारखंडमध्ये 'लाडक्या बहिणीला' मोदींचा विरोध, वडेट्टीवारांचा हल्ला