तलावाच्या काठावर तिघांचे कपडे दिसले, संशय आला अन् थेट उड्या घेतल्या, ‘ते’ दृश्य पाहून गाव हादरलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : नाथषष्ठीमुळे शाळेला सुटी असल्याने आनंदाने पोहायला गेलेल्या तीन चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील नानेगाव-जंजाळा रस्त्यावरील गट क्र. 154 मधील तलावात बुडून तीन शालेय विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तब्बल 9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांच्या मदतीने सायंकाळी 7 वाजता तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उमर अनवर बेमरोट (10), साद अनवर बेमरोट (7) हे सख्खे भाऊ आणि सरफराज सलीम देहेंगल (9, तिघे रा. नानेगाव) अशी मृत मुलांची नावे आहेत. सरफराज देहेंगल हा गावातील जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिकत होता, तर उमर बेमरोट चौथीचा विद्यार्थी होता. साद बेमरोट हा पांगरी येथील खासगी इंग्रजी शाळेत पहिलीमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षण घेणाऱ्या या तिघा चिमुकल्यांचे आयुष्य इतक्या लहान वयात संपल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
सोमवारी दुपारी सुमारे 2 वाजता ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तलावावर मोटारपंप सुरू करण्यासाठी गेला असता त्याच्या नजरेस तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसले. संशय आल्याने त्याने तात्काळ ही माहिती गावात दिली. ही बातमी समजताच पालक आणि ग्रामस्थ धावतच तलावाकडे पोहोचले. काही गावकऱ्यांनी आणि गोताखोरांनी तलावात उड्या घेत मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले.
advertisement
दरम्यान, या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात सोमवारी रात्री सुमारे 11 वाजता गावातील कब्रस्तानमध्ये तिघांवर दफनविधी करण्यात आला.
नेमके काय घडले?
नाथषष्ठीमुळे सोमवारी शाळेला सुटी असल्याने हे तिघेही तलावावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. तलावात आंघोळ करताना ते तिघेही नकळत पाण्याच्या खोल भागाकडे गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध सुरू केला; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता. दरम्यान ग्रामपंचायतीचा कर्मचारी पाणीपुरवठ्यासाठी मोटारपंप सुरू करण्यासाठी तलावावर गेला असता त्याला तलावाच्या काठावर मुलांचे कपडे दिसून आले आणि या भीषण दुर्घटनेचा उलगडा झाला.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तलावाच्या काठावर तिघांचे कपडे दिसले, संशय आला अन् थेट उड्या घेतल्या, ‘ते’ दृश्य पाहून गाव हादरलं








