अभिमानास्पद! शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा UNESCO च्या यादीत समावेश, संभाजीराजे म्हणतात '10 वर्षांच्या प्रयत्नांना यश पण...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
UNESCO Maharastra Forts : अख्खा महाराष्ट्र अभिमानाने सांगू शकतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश झाला.
Sambhajiraje On UNESCO Forts : अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकिल्ल्यांचा डंका जगभरात गाजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा (World Heritage Sites) स्थळाचा दर्जा देण्यात आलाय. अशातच आता कोल्हापूर गादीचे वारसदार संभाजीराजे यांनी पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.
कोणते 12 किल्ले?
महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू येथील स्वराज्याची तिसरी राजधानी राहिलेला जिंजी किल्ला अशा बारा किल्ल्यांचा World Heritage Sites मध्ये समावेश झालेला आहे. त्यावर संभाजीराजे यांनी काही फोटो शेअर केले अन् भावना व्यक्त केल्या.
जागतिक वारसा स्थळाचे नामांकन
advertisement
युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) कडून जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाल्याने हे किल्ले जागतिक पर्यटन स्तरावर आले आहेत. यामुळे आपला उज्ज्वल इतिहास जागतिक स्तरावर पोहोचण्याबरोबरच पर्यटनवाढ, स्थानिक रोजगार निर्मिती आदी बाबींनाही चालना मिळणार आहे, असं संभाजीराजे यांनी यावेळी म्हटलंय.
संभाजीराजे म्हणतात...
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हे युद्धशास्त्रीय वास्तुकलेचा अद्वितीय वारसा असून जगात इतरत्र कुठेही असे गडकोट पाहायला मिळत नाहीत. हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्रातील गडकोट जागतिक स्तरावर पोहोचावेत, या उद्देशाने युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी सन 2015 पासून मी प्रयत्नशील होतो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 2016 व 2017 साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ समितीस महाराष्ट्रात निमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती दिली होती. युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्यासाठी तत्कालीन सरकारकडेही मी वेळोवेळी पाठपुरावा केला होता, असंही संभाजीराजे म्हणाले.
advertisement
सरकारमधील मंत्र्यांचे आभार
याकरिता ज्यांनी राजस्थान मधील किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्या डॉ. शिखा जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी देखील मी आग्रही होतो. राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य पावले उचलली. या सर्वांचे फलित म्हणून आज महाराजांचे 12 गडकोट जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. असं म्हणत त्यांनी सरकारमधील मंत्र्यांचे आभार मानले.
advertisement
सरकारकडे मोठी मागणी
मात्र, युनेस्कोकडून या स्थळांच्या विकासासाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे या गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आणखी ठोस पावले उचलणे आता अत्यावश्यक आहे. या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीची तरतूद करून जतन, संवर्धन व विकासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे. या बारा किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक भर देऊन इतरही किल्ल्यांचे संवर्धन कार्य राज्य सरकारने हाती घ्यावे व उर्वरीत किल्लेही या यादीत समाविष्ट होतील यादृष्टीने प्रयत्नशील राहावे, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अभिमानास्पद! शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा UNESCO च्या यादीत समावेश, संभाजीराजे म्हणतात '10 वर्षांच्या प्रयत्नांना यश पण...'