काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना घरातूनच झटका, लागोपाठ राजीनामे, हर्षवर्धन सपकाळ यांचे टेन्शन वाढले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Harshwardhan Sapkal: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बड्या नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने अतिशय स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व दिले आहे.
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षसंघटना वाढीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सपकाळ राज्यभरात जाऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटनेच्या समस्या जाणून घेत आहेत. परंतु त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यातूनच काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्यावर प्रचंड नाराज असून काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कुणी-कुणी राजीनामे दिले?
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यानंतर आता काँग्रेसचे शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोले, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे आणि खामगाव शहराध्यक्ष सरस्वती ताई खाचणे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सानंदा हे 12 जून रोजी 25 हजार कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना धक्का देऊन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आपल्या मनगटावर घड्याळ बांधतील.
स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्याच्या काँग्रेसची सूत्रे
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशानंतर विधानसभेतही काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असे पक्षनेतृत्वाला वाटत होते. मात्र पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे पक्षाला जबर धक्का बसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातही पक्षातील काही नेते नाराज होते. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यपदाच्या निवडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होत्या. आक्रमक नेते सतेज पाटील, विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख यांचीही नावे प्रदेशाध्यपदासाठी चर्चेत होती. परंतु पक्षाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर अधिक विश्वास दाखवला.
advertisement
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बड्या नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने अतिशय स्वच्छ प्रतिमेच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व दिले आहे. एरवी सहकारसम्राट किंवा शिक्षणसम्राट नेत्याकडे काँग्रेसची सूत्रे असायची. सहकार चळवळीतील नेत्याकडे पक्षाची सूत्रे असतील असेल तर अधिकाधिक लोकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार रुजवता येईल, अशी पक्षाची धारणा होती. पण यंदा ठरवून पक्षाने साखर सम्राट आणि शिक्षणसम्राट नेत्यांवर फुली मारून महाराष्ट्राच्या संघटनेची जबाबदारी कोणताही डाग नसलेले आणि कोणतीही भीडभाड न ठेवता सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे नेतृत्व म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षाच्या अध्यक्षपदी संधी दिली.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
June 04, 2025 10:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना घरातूनच झटका, लागोपाठ राजीनामे, हर्षवर्धन सपकाळ यांचे टेन्शन वाढले


