भुजबळांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा, म्हणाले आम्ही त्यांचा राजीनामा...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गडचिरोली, महेश तिवारी, प्रतिनिधी : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सगे सोयरेची मागणी मान्य झाल्यानंतर आता ओबीसी समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे, शनिवारी ओबीसी समाजाचा (OBC) महाएल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘सरकार आणि विरोधी पक्षातील लोक राजीनामा द्या म्हणत आहेत. मी असं भाषण करतो म्हणून सरकारमधून काढून टाका अशी मागणी करत आहे. मला लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा असंही म्हणतात. पण मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अडीच महिने शांत आहे. मला लाथ घालायची गरज नाही. ओबीसीसाठी लढत राहणार’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भुजबळ यांच्या राजीनाम्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गडचिरोलीमध्ये आले असता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अधिक विस्तारानं सांगू शकतील, पण मुख्यमंत्र्यांनी किंवा मी त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही, असा खुलासा फडणवीस यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर केला आहे.
advertisement
छगन भुजबळांचा सरकारला प्रश्न
मनोज जरांगे पाटील यांनी 27 जानेवारीला गुलाल उधळला. मग पुन्हा उपोषणाला का बसणार आहेत? ज्याला अध्यादेश आणि मसुद्यातील फरक कळत नाही. चार दिवसांपासून उन्माद सुरू आहे. ओबीसींच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आम्ही जिंकलो म्हणून जल्लोष करताय. मग उपोषण कशासाठी? असा प्रश्न भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केला आहे. एक एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील लोक भांडत असतात त्यांना काही मिळत नाही. मात्र, यांनी उपोषण करणार म्हटलं की लगेच सरकारची धावाधाव होते. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. वेगळं आरक्षण द्या हरकत नाही. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही. मात्र, तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेलात आणि जाहीर केलं की मी घेतलेली शपथ पूर्ण केली. मग शपथ पूर्ण झाली आहे. तर हे सर्वेक्षण कशासाठी? आयोगाचं खोटं सर्वेक्षण सुरू आहे. 180 प्रश्न आहे, एका घराला दीड तास लागतो. मग एव्हढ्या कमी वेळेत कसं सर्व्हेक्षण झालं? फक्त जात विचारली जाते आणि बाकी ऑफीसमध्ये भरलं जातंय, असा गंभीर आरोप भुजबळ यांनी सर्वेक्षणावर केला आहे.
Location :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
Feb 04, 2024 8:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
भुजबळांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा, म्हणाले आम्ही त्यांचा राजीनामा...









