Amravati: लग्न लागलं, सगळे खूश होते अन् राघव स्टेजवर आला आणि नवरदेवाच्या मांडीत चाकू खुपसला, असं काय बिनसलं?
- Reported by:SANJAY SHENDE
- Published by:Sachin S
Last Updated:
अमरावतीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.
अमरावती : राज्यभरात सगळीकडे सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. अशातच अमरावतीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, हा सगळा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. हल्ला करणारा तरुण हा नवरदेवाचा मित्र होता. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, अमरावती शहरात बडनेरा रोडवर साहिल लॉनमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. सुजल राम समुद्रे या युवकाचं साहिल लॉनमध्ये लग्न होतं. लग्न आटोपल्यानंतर स्वागत समारंभ सुरू असतानाच त्याच परिसरातील आरोपी राघव बक्षी याने लग्न मंडपात स्टेजवर जाऊन नवरदेव असलेल्या सुजल समुद्रे याच्या मांडीवर चाकूने वार करून हल्ला करून जखमी केलं. त्यानंतर आरोपी पळून जात असताना सुजल समुद्रे यांच्या वडिलांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, असता त्यांच्यावर देखील आरोपीने हल्ला केला. हा संपूर्ण घटनाक्रम ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून कैद झाला.
advertisement
हल्लेखोर नवरदेवाचा मित्र, डीजेवरून झाला होता वाद
दरम्यान, हल्लेखोर राघव बक्षी आणि नवरदेव सुजल समुद्रे हे दोघे शेजारी शेजारी राहणार आहे. दोघेही चांगले मित्र आहे. पण, अचानक दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. सुजल समुद्रे याने राघव बक्षी याला लग्नात डीजे आणण्याचं सांगितलं होतं. दोघांमध्ये याबद्दल चर्चा ही झाली होती. पण, अचानक सुजल याने डीजे रद्द केला. त्यामुळे राघव बक्षी हा चिडला. मी समोर डिजेवाल्याला शब्द दिला होता, त्याला आता मला पैसे द्यावे लागतील. माझा हा अपमान झाला आहे, असं म्हणत राघव याने सुजयसोबत दोन दिवसांपूर्वी वाद घातला होता. असंही सांगितलं जात आहे की, सुजल आणि राघव दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी सुजल याने राघवचा मोबाईल फेकून दिला होता. त्याचाही राघवला राग होता. याचाच राग धरून त्याने हे कृत्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे. हल्ला करून पळून जात असताना त्याला एक अल्पवयीन मुलाने मदत केल्याचंही समोर आलं.
advertisement
राघव गुन्हेगारी प्रवृत्तीचा
दरम्यान, राघव बक्षी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर याआधीही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. सुजलवर हल्ला केल्यानंतर राघव हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. राघवला अटक करावी अशी मागणी सुजल समुद्रे यांच्या वडिलांनी केली आहे. तर आरोपी राघव बक्षी याच्यावर बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
Nov 12, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: लग्न लागलं, सगळे खूश होते अन् राघव स्टेजवर आला आणि नवरदेवाच्या मांडीत चाकू खुपसला, असं काय बिनसलं?







